सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लादल्या गेलेल्या दुसऱ्या लॉकडाऊन च्या काळातही प्रेक्षकांचे मनोरंजन अबाधित राहावे याची दक्षता अनेक मालिका निर्मात्यांनी घेतली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील मालिका 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेच्या निर्मात्यांनीसुद्धा हीच खबरदारी घेतलीय. महाराष्ट्रात शुटिंग्सना बंदी घातली गेल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राबाहेर चंबूगबाळे हलवत नवीन भागांचे चित्रीकरण सुरु ठेवले.
'तू सौभाग्यवती हो' ही मालिका फारच कमी काळात प्रेक्षकांना आवडू लागली आहे. गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचं प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.