महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे १३ वर्षांनी पुन्हा एकत्र! - ‘आई कुठे काय करते’ मालिकेत शंतनू मोघे

‘आई कुठे काय करते’ मालिकेत मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे हे तब्बल १३ वर्षांनंतर एकत्र काम करीत आहेत. याआधी तेरा वर्षांपूर्वी या दोघांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे दोघांनाही आनंद झाला आहे.

Milind Gawli and Shantanu Moghe
मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे

By

Published : Aug 5, 2021, 8:31 PM IST

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील भाऊ अनिरुद्ध आणि अविनाश यांची भूमिका करीत असलेले कलाकार मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे हे तब्बल १३ वर्षांनंतर एकत्र काम करीत आहेत. याआधी तेरा वर्षांपूर्वी या दोघांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे या लाडक्या सहकलाकारासोबत तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद मिलिंद गवळी यांनी शेअर केला आहे.

मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर अरुंधतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबाला अरुंधतीचा विरह सहन होत नाहीय. अश्यातच अनिरुद्धचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखच्या येण्याने कुटुंबातल्या प्रत्येकालाच थोडा धीर मिळाला आहे. देशमुख कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा पुर्ववत करण्याची जबाबदारी सध्या अविनाशच्या खांद्यावर आहे. अभिनेते मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे या मालिकेत भावाची भूमिका साकारत आहेत. अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी आपल्या लाडक्या मित्राच्या भेटीचा योग तेरा वर्षांनी जुळून आलाय त्यासंबंधित खास किस्सा सांगितला.

‘शंतनु मोघे या अतिशय गोड माणसाबरोबर तेरा वर्षांपूर्वी ‘हळद तुझी कुंकू माझं या सिनेमामध्ये पहिल्यांदा काम केलं. या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग साताऱ्याच्या आजुबाजूच्या खेडेगावात झालं. शंतनूचा तो पहिलाच मराठी चित्रपट होता. मराठी चित्रपट सृष्टीत त्याचं पदार्पण या सिनेमानं झालं. एका उत्तम कलाकाराचा तो मुलगा असल्यामुळे त्याच्यातही ते सगळे गुण होते. पहिलाच चित्रपट असला तरी कामाची जाण खूप छान होती, कष्ट करायची तयारी होती. त्याचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे तो माणूस म्हणून खूपच गोड आणि लाघवी आहे.”

मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे

ते पुढे म्हणाले, “सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याच्याशी छान मैत्री झाली. मात्र त्यानंतर त्याची माझी भेट झाली नाही. आई कुठे काय करते मालिकेच्या निमित्ताने आम्ही तेरा वर्षांनी भेटलो. मालिकेत अविनाशही अनिरुद्धला जवळपास पंधरा वर्षांनी भेटतो असा प्रसंग आहे. माझ्यासाठी शंतनू आणि अविनाशचं येणं हा योगायोगच आहे असं वाटतं. खरतर अविनाश या व्यक्तिरेखेचं कास्टिंग जवळपास दोन महिने सुरु होतं. ही भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता होतीच. पण शंतनूचं नाव कळताच मला अतिशय आनंद झाला.”

तर अभिनेता शंतनू मोघेनेही मिलिंद गवळी बद्दल आपले मनोगत व्यक्त करीत सांगितले की, ‘मिलिंद सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे. आज पर्यंत अनेकांशी संपर्क आला, पण काही लोक आपल्या मनात एक अढळ स्थान निर्माण करतात. त्यापैकी एक म्हणजे मिलिंद गवळी. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याचा प्रेमळ स्वभाव आणि मनाचा मोठेपणा. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला मिलिंद सारख्या मोठ्या कलाकाराचा सहवास इतका जवळून लाभतोय. अविनाश आणि अनिरुद्धच्या नात्याचे अनेक कंगोरे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहेत ज्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन होईल.”

‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

हेही वाचा - 'हनीमून'पासूनच 'हनी सिंग'ने मांडला होता छळ, शालिनीचा मोठा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details