मुंबई -चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अभिनेता शशांक शेंडे आणि अभिनेता शंतनू गंगणे यांनी बहुरुपी 'मंच स्टेज अँड स्क्रीन अॅकॅडमी'ची स्थापना केली आहे. लेखन, अभिनयासह रंगमंच आणि स्क्रीनच्या विविध अंगांबाबतचे परिपूर्ण मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे. अभिनेता अमेय वाघ यांच्या हस्ते नुकतेच या अॅकॅडमीचे उद्घाटन झाले.
रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजच्या क्षेत्रात अलीकडे अनेक संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. मात्र, या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना आणि स्थिरावू पाहणाऱ्यांना अनेकदा नेमकी माहिती, संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तरुणांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागतो. तसेच अनेक निर्माते, दिग्दर्शकही चांगल्या कलाकारांच्या शोधात असतात. त्यामुळे त्यांना चांगले कलाकार मिळवून देण्याचे कामही बहुरुपी मंच करणार आहे.
हेही वाचा -'चोरीचा मामला' सिनेमासाठी कलाकारांनी का सांडलं रक्त, त्या बंगल्यात नक्की घडलं काय..?
'रिंगण' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला लेखक दिग्दर्शक मकरंद माने, अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलेले अभिनेते शशांक शेंडे, टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये अभिनयासह कार्यकारी निर्मितीचाही अनुभव असलेल्या शंतनू गंगणे यांनी या अॅकॅडमीची स्थापना केली आहे. शशांक शेंडे यांनी अलिकडेच 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात 'शेलारमामा'ची भूमिका साकारली आहे.