मुंबई - रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा या जोडीने ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटातून ब्रेक अप सॉंग फेमस केले. आता मराठीमध्ये ब्रेक अप सॉंग येतेय. ते एक रॅप सॉंग असून ‘चांगली खेळलीस तू’ हे त्याचे टायटल आहे. “तिच्या सोबतीने केला आयुष्यातील सुंदर क्षणांचा प्रवास आणि तिच्याविना तळमळत राहिलो त्या क्षणांच्या आठवणीत... अशीच काहीशी गत होते ज्यांचं ब्रेकअप होतं. ती नसली म्हणून आयुष्यच थांबलं का? तिच्या शिवाय आयुष्यात रस उरला नाही का? ‘किस्सा घर प्रॉडक्शन्स’, ‘मिडीया वर्क्स स्टुडियो’ यांच्या सहकार्याने प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतोय #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’. मराठी ब्रेकअप रॅप साँग आणि नवीन जोडी लवकरच प्रेक्षकांना अनुभवायाला मिळणार आहे.
या गाण्यात अभिनेता विनय प्रतापराव देशमुख आणि ग्लॅमरस अभिनेत्री रुचिरा जाधव यांची जोडी दिसणार आहे. रुचिराने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. झी मराठीवरील ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत रुचिराने साकारलेली ‘माया’ची भूमिका लोकप्रिय ठरली. आता या गाण्याच्या माध्यमातून रुचिरा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय, त्यामुळे तिला पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग नक्कीच उत्सुक असणार यात शंका नाही. या गाण्याच्या निमित्ताने रुचिरा, विनय देशमुखसोबत स्क्रिन शेअर करतेय.
मयंक पुष्पम सिंह निर्मित आणि विनय प्रतापराव देशमुख दिग्दर्शित ‘चांगली खेळलीस तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप आहे. ब्रेकअप दरम्यान एखाद्याच्या मनात नेमके काय विचार येतात ते ‘चांगली खेळलीस तू’ या गाण्याच्या माध्यमातून दिसणार आहे. ‘चांगली खेळलीस तू’ या गाण्याच्या शिर्षकावरुन गाण्याचा विषय नेमका काय आहे याचा अंदाज प्रेक्षकांना आलाच असेल. पण म्युझिक, गाण्याचे बोल, कलाकारांच्या भूमिकेची झलक, एकंदरीत गाण्याचाही अंदाज आता आला असावा कारण नुकताच या ब्रेकअप रॅपचा टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे.