महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 3, 2021, 10:23 PM IST

ETV Bharat / sitara

लॉकडाऊन नंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट, ‘जयंती’चा ट्रेलर झाला अनावरीत!

चित्रपटगृहे उघडण्यात आली असून अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. हिंदी चित्रपटांच्या गर्दीत एक पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘जयंती’चा ट्रेलर
‘जयंती’चा ट्रेलर

कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे महाराष्ट्रासकट देशातील जवळपास सर्वच चित्रपटगृहे उघडण्यात आली असून अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. हिंदी चित्रपटांच्या गर्दीत एक पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

देशाच्या विकासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचे हात आहेत. आपल्याकडे अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात आणि सामाजिक कार्यासोबतच कालांतराने त्याभोवती राजकीय वलय आलेली दिसतात आणि नेमक्या याच विषयावर भेदक प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे ‘जयंती’. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

‘जयंती’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता ऋतुराज वानखेडे आणि टेलिव्हिजन अभिनेत्री तितिक्षा तावडे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री तितिक्षा म्हणाली, "जयंती या सिनेमात मी समंजस आणि थोरपुरुषांच्या विचारांचे नेमके अनुकरण करणाऱ्या तरुणीची भूमिका साकारत आहे. भविष्यात जर या पात्राचे सामान्य जीवनात थोडेफार जरी अनुकरण झाले तरी माझी ही मेहनत सफल झाली असे मी मानेन." ऋतुराज एका बड्या राजकारण्याच्या खास कार्यकर्त्याची भूमिका साकारतोय. यानिमित्ताने अभिनेता ऋतुराज वानखेडे म्हणाला, "आजपर्यंत मी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत पण जयंती माझ्यासाठी एक नवे आव्हान देणारा सिनेमा आहे. मोठ्या पडद्यावर येण्याचा हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे मला चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत."

हिंदी टेलिव्हिजन जगतात ज्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळाच प्रेक्षकवर्ग तयार करून ठेवला आहे असे अभिनेते अमर उपाध्याय हे पहिल्यांदाच मराठी सिनेमात विशेष भूमिका साकारत आहेत. जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांनी सिनेमात एका ध्येयवादी शिक्षकाची भूमिका साकारली आहे. एक चांगला शिक्षक संपूर्ण समाज सुधारू शकतो या वाक्याला पूरक ठरेल अशी मिलिंद शिंदे यांची भूमिका आहे. तसेच या सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, किशोर कदम, पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

बॉलिवूड चित्रपट आर्टिकल १५, मुल्क, थप्पड तसेच सुप्रसिद्ध मराठी चित्रपट नारबाची वाडी, देऊळ सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांना त्याच तोडीचं पार्श्वसंगीत देणाऱ्या मंगेश धाकडे यांनी जयंती सिनेमाला पार्श्वसंगीत दिले असून संगीत दिग्दर्शिका रुही आणि मंगेश धाकडे यांनी सिनेमाच्या गाण्यांना संगीत दिले आहे. भारतीय संगीतक्षेत्रात ज्यांचं नाव मानाने घेतले जाते असे गायक जावेद अली यांनी या चित्रपटातील दोन गीतांना आपला सुमधुर आवाज दिला असून सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटाचे गाणे लिहिले आहे. या सिनेमाचे प्रमोशनल साँग "लवशीप देशील का" हे गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिले असून सुहास सावंत यांनी गायले आहे. तसेच जावेद अली यांनी रोमँटिक "तुला काय सांगू कळेना" गायले आहे.

शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत सिंग अभिनित 'डॉक्टर जी' ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

ABOUT THE AUTHOR

...view details