महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रजासत्ताक दिनी अण्णा नाईक करणार सैनिकांना मदत - Ratris khel Chale team latest news

'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आले आहेत. यात जमा झालेला निधी सैनिकांच्या मदतीसाठी पाठवला जाणार आहे.

Ratris khel Chale team help to Soldiers on Republic day
प्रजासत्ताक दिनी अण्णा नाईक करणार सैनिकांना मदत

By

Published : Jan 24, 2020, 5:53 PM IST

मुंबई -'झी मराठी' वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. या मालिकेतील अण्णा या व्यक्तिरेखेला प्रेक्षक आणि चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. या मालिकेतील अण्णाची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर यांनी मागील वर्षापासून एका चांगल्या कामासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिनी सैनिकांना मदत करता येणार आहे.

'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आले आहेत. यात जमा झालेला निधी सैनिकांच्या मदतीसाठी पाठवला जाणार आहे. या मालिकेचे शूटिंग पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे आता तिसरा ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आला आहे.

अण्णा नाईक

सावंतवाजीपासून अवघ्या ५ ते ६ किमी अंतरावर असलेल्या आकेरी या गावात या मालिकेचे शूटिंग सुरू आहे. अण्णा नाईक आणि शेवंतासह सर्व कलाकारांना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सेटवर नेहमीच गर्दी होत असते. या गर्दीच्या सहभागाने आपल्या देशातील सैनिकांसाठी काही करता आले तर? अशी कल्पना माधव अभ्यंकर यांना सुचली.

अण्णा नाईक

गेल्यावर्षी जानेवारीपासून त्यांनी सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवायला सुरुवात केली. ‘सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट, सैनिकहो तुमच्यासाठी!’ असे या ड्रॉप बॉक्सवर लिहिले आहे. मी तुमच्यासोबत सेल्फी काढेन, पण आपल्या सैनिकांसाठी शक्य ती मदत करा, असे आवाहन अभ्यंकर यांनी चाहत्यांना केलं आणि पाहता पाहता या ड्रॉप बॉक्स मध्ये जवळपास लाखभर रुपयांचा निधी जमा झाला आहे. फॅन्सनीदेखील त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून अगदी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत त्यांनी आपल्या परीने सैनिकांसाठी मदत केली.

हेही वाचा -ही आहे हृतिक रोशनची पर्सनल टीम

हा उपक्रमाबद्दल राबवल्यानंतर आता हा निधी सैनिकांच्या स्वाधीन करण्याची वेळ आली आहे. हा निधी माधव अभ्यंकर २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवशी एका मिलिटरी शाळेला देऊ करणार आहेत.

याबद्दल बोलताना माधव अभ्यंकर म्हणाले, "सिंधुदुर्ग सैनिक शाळेत मला मागील महिन्यात वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते. मी तिथे गेल्यावर मला जाणवलं की इथून कितीतरी मुलं सैन्यात भरती होतात. ही संस्था माजी सैनिकांनी पुढाकार घेऊन स्थापन केली आहे. मी माझ्या 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या टीमशी याबाबत चर्चा केली. प्राणांची पर्वा न करता सीमेवर लढलेले सैनिक एकत्र येऊन अशा प्रकारची संस्था उभी करतात. अधिकाधिक मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी तयार करतात. अशा संस्थेला आपण निधी दिला पाहिजे असं मी त्यांना सुचवलं. सगळ्यांच्या संमतीने आम्ही आता पर्यंत जमलेला निधी येत्या २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवशी या संस्थेला देणार आहोत'.

हेही वाचा -'पूर्वी'शिवाय नीलचे अजिबात 'लागे ना' मन, मेकअपच नवं गाणं लाँच

ABOUT THE AUTHOR

...view details