महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जेएनयू विद्यार्थी हल्ल्यावर अमिताभ यांची 'अळीमिळी गुपचिळी'!!

बच्चन यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर केवळ हात जोडलेला 'इमोजी' ट्विट केला होता. यावर अनेक प्रतिक्रिया त्यांना मिळत असून त्यांचे गप्प राहणे नेटकऱ्यांना पसंत पडलेले नाही.

By

Published : Jan 6, 2020, 6:16 PM IST

Amitabh Bachan
अमिताभ बच्चन


मुंबई - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा बॉलिवूड जगतातून निषेध होत असताना अमिताभ बच्चन यांनी केवळ हात जोडलेला इमोजी ट्विट केला आहे. बिग बी यांच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही अनेक नेटकरी करत आहेत.

रात्रीच्या अंधारात चेहरा लपवून हातात काठ्या आणि रॉड घेऊन जेएनयू विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करण्यात आला. यात असंख्य विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी एक ट्विट केले. त्यांच्या ट्विट क्रमांक ३६०२ मध्ये त्यांनी केवळ हात जोडलेला इमोजी ट्विट केलाय. त्यांच्या या ट्विटवर रिट्विट करीत अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

एका युजरने म्हटलंय की, 'मैं आज भी फेंके हुये पैसे नहीं उठाता बोलनेवाला दिवार का विजय आज असल जिंदगी में पूरा पराजय हो चुका है.'

फक्त बाबूंजींची 'अग्नीपथ' कविता वाचण्याने कोणी साहसी होत नाही, अशी बोचरी टीकाही युजरने केली आहे.

दुसरा एक युजर गौरव राणाने म्हटलंय, की दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सरकारने तुमचे तोंड बंद केलंय. इतकी गुंडागर्दी पाहूनही रक्त उसळत नसेल तर ते रक्त नाही पाणी आहे.

आणखी एका युजरने अमिताभ यांच्या हात जोडण्याचा अर्थ लावत बिंग बींचे समर्थन केलंय. त्यांनी लिहिलंय, 'अमिताभ मोदीजींना हात जोडून म्हणत आहेत, की आता बस करा साहेब अजून किती आग लावाल. एक दिवस वरती जायचे आहे कोणत्या तोंडाने जाल?'

मनिष शर्मा या युजरने लिहिलंय की, 'चुकीला चुकीचे आणि योग्यला योग्य बोलण्याची क्षमता तुमच्यात नसेल तर तुमची सर्व प्रतिभा व्यर्थ आहे.'

सरकारच्या बाजूने का असेना पण काही तरी बोला असे आवाहनही एका युजरने केलंय.

एका युजरने अमिताभ यांच्या गप्प राहण्यावर आक्षेप घेत म्हटलंय, की भारतातील विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू झालेत. आता तरी या देशाचे भवितव्य बरबाद होण्यापूर्वी बोला.

विद्यापीठात चेहरे झाकलेल्या काही गुंडांनी काल रात्री प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांना वसतीगृहात घुसून मारहाण सुरू केली. या पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी रात्री उशीरा आपले वरील ट्विट केले होते.

जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या आणि स्टुडंट प्रेसिडन्ट आयेशी घोष हिलाही गंभीर जखम झाली आहे. तिच्या डोळ्याच्या वर रॉडने हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details