सध्या चित्रपटसृष्टीत जुन्या चित्रपटांचे वर्धापन दिन साजरे करण्याची फॅशन आलीय. अगदी तीन-चार वर्षांपासून तो चाळीस-पन्नास वर्षांपर्यंत हे वर्धापनदिन साजरे केले जातात. सोशल मीडियाची पोच सर्वदूर पोहोचली असल्यामुळे त्या माध्यमातून सिनेमासंदर्भातील व्यक्ती एकमेकांना शुभसंदेश पाठवत असतात आणि लोकांनाही आपल्या आनंदात सामील करून घेत असतात. १२ जुलै ला संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास’ ला १९ वर्षे पूर्ण झाली आणि साहजिकच समाज माध्यमांवर अभिनंदनाचा पाऊस पडला कारण यातील तीन मुख्य कलाकार होते, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित (नेने).
सरतचंद्र चट्टोपाध्याय लिखीत देवदास कादंबरी
सरतचंद्र चट्टोपाध्याय यांची ‘देवदास’ ही शोकांतिका १९१७ मध्ये प्रकाशित झाली होती. देवदास हा बंगाल मधील एका परगण्यात श्रीमंत घराण्यातील मुलगा आणि एका सामान्य घरातील मुलगी पार्वती म्हणजेच पारो यांची लहानपणापासूनच दोस्ती असते. तो काही वर्षांसाठी उच्च शिक्षणासाठी कलकत्याला (आताचे कोलकाता) जातो. परत आल्यावर वयात आलेली आणि अतिशय सुंदर दिसणाऱ्या पारोला पाहून तो हरखून जातो व तिच्यावर प्रेम करू लागतो. पारो त्याच्यावरच प्रेम करत असते आणि त्याच्यासोबतच्या सुखी संसाराची स्वप्ने बघत असते. परंतु त्यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक दुरींमुळे त्यांची ताटातूट करण्यात येते. पारोचे लग्न एका विधुराशी लावून देण्यात येते आणि त्या धक्क्याने देवदास दारूच्या आहारी जातो. रोज तिच्या आठवणीत सकाळ संध्याकाळ फक्त दारू पित राहतो. खूप प्रयत्न करूनही त्याची दारूची लत सुटत नाही. पारोच्या आठवणींतून देवदास ला बाहेर काढण्यासाठी त्याचा मित्र चुन्नी बाबू एके दिवशी त्याला एका कोठ्यावर घेऊन जातो जेथील एक नायकीण चंद्रमुखी खूप सुंदर असते तसेच तिच्या अप्रतिम नृत्याची ख्याती सर्वदूरपर्यंत पसरलेली असते. देवदास ला भेटल्यावर त्याची अवस्था आणि त्याचे पारोवरील निस्सीम प्रेम पाहून तिचे मन त्याच्यावर जडते आणि चंद्रमुखी देवदास च्या एकतर्फी प्रेमात पडते. पुढे देवदासची अवस्था बिकट होते आणि अनेक नाट्यमय प्रसंगानंतर तो इहलोक सोडून निघून जातो.
अनेक चित्रपट निर्मात्यांना भुरळ घालणारे कथानक
देवदास मधील पात्रे अस्सल वाटल्यामुळे अनेक फिल्ममेकर्सना या कादंबरीने भुरळ घातली. या चित्रपटावर हिंदीत प्रामुख्याने तीन, त्याच नावाचे, चित्रपट बनले. पहिला ‘देवदास’ बनला होता १९२८ साली, मूकपटांच्या जमान्यात. यात फणी बर्मा, तारकबाला आणि पारूलबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या व याचे दिग्दर्शन केले होते नरेश मित्रा यांनी. दुसरा देवदास जास्त फेमस झाला कारण त्यात ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार ने देवदास रंगविला होता. त्यावेळी अशी आख्यायिका होती की चित्रपटाच्या शेवटाला दिलीप कुमार (म्हणजे तो रंगवीत असणारे पात्र) मरण पावल्यावर सिनेमा हीट होतो. १९५५ साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दिलीप कुमार खूप मोठा स्टार होता आणि ‘देवदास’ ने त्याच्या प्रसिद्धीला चार चांद लावले. त्यातील पारोची भूमिका सुचित्रा सेन ने तर चंद्रमुखी ची भूमिका वैजयंतीमाला ने साकारली होती.
भन्साळींचा देवदास