महाराष्ट्र

maharashtra

राजकुमार हिराणी 'क्रिकेट'वर बनवणार दोन चित्रपट, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

By

Published : Dec 4, 2019, 7:13 PM IST

राजकुमार हिराणी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेट या विषयावर ते पुढील चित्रपट बनवणार असून एक नव्हे तर याच क्रिकेट विषयावरील दोन चित्रपटांची ऑफर त्यांना मिळाली आहे.

Rajkumar Hirani
राजकुमार हिराणी


मुंबई - ख्यातनाम आणि यशस्वी दिग्दर्शक राजकुमार हिराणी कोणता नवा चित्रपट बनवणार याची प्रतीक्षा संपूर्ण भारत करीत आहे. आजवर प्रत्येक चित्रपट हिट देण्याची त्यांची हातोटी प्रेक्षकांना भावली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेट या विषयावर ते पुढील चित्रपट बनवणार असून एक नव्हे तर याच क्रिकेट विषयावरील दोन चित्रपटांची ऑफर त्यांना मिळाली आहे.

'संजू' हा संजय दत्तवरील चित्रपट बनवल्यानंतर गेली एक वर्ष हिराणी यांनी नव्या चित्रपटाची सुरुवात केली नाही. त्यामुळे साहजिकच त्यांचा नवा चित्रपट कोणता याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. त्यांना दोन चित्रपटाच्या 'स्क्रिप्टस' मिळाल्या असून त्यावर ते काम सुरू करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यातील एक चित्रपट फॉक्स स्टार फिल्म्सचा असून दुसरा चित्रपट सहलेखक अभिजात जोशी यांनी लिहिला आहे.

फॉक्स स्टारच्या वतीने लाला अमरनाथ यांच्या बोयोपिकसाठी हिराणी यांना संपर्क करण्यात आला आहे. पियुष गुप्ता आणि नीरज सिंग यांनी याची कथा लिहिली आहे. दुसरा चित्रपट अर्थात वर लिहिल्याप्रमाणे अभिजात जोशी यांनी लिहिलाय.

दरम्यान, राजकुमार हिराणी यांच्याकडे वेबसिरीज आणि इतरही काही कथानके आहेत. ट्रेड अ‌ॅनालिस्ट तरण आदर्श आणि राजकुमार हिराणी यांनी क्रिकेटवरील दोन चित्रपटांसाठी संपर्क झाल्याचा खुलासा ट्विटरवर केला आहे.

राजकुमार हिराणी यांनी स्वतःच्या दिग्दर्शनाखाली बनवलेला पहिला चित्रपट होता 'मुन्नाभाई एमबीबीएस'. संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. राजकुमार हिराणी हे नाव या सिनेमामुळे घराघरात पोहोचले. त्यानंतर २००६ मध्ये या चित्रपटाचा पुढील भाग 'लगे रहो मुन्नाभाई' बनवला. त्यालाही उत्तुंग यश मिळाले. चित्रपट दिग्दर्शनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या हिराणी यांनी २००९ मध्ये 'थ्री इडियट्स' बनवला. या चित्रपटाने अक्षरशः इतिहास रचला. हिराणी पुढील चित्रपट कोणता बनवणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले. परंतु, घाईघाईत सिनेमा बनवणाऱ्यांपैकी हिराणी नाहीत. त्यांनी तब्बल पाच वर्षे वेळ घेतला आणि संपूर्ण देशाला वेड लावणारा सुपरहिट 'पीके' बनवला.

गेल्या वर्षी संजय दत्तचा बायोपिक 'संजू' घेऊन राजकुमार हिराणी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आले. अर्थात या चित्रपटालाही अपेक्षित यश मिळाले. आता त्यांच्या पुढच्या सिनेमाची प्रतिक्षा संपूर्ण देश करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details