पूर्व लडाखमधली परिस्थिती 100 दिवस उलटून गेल्यावरही आहे, तशीच आहे. भारताने वारंवार चीन लष्कराला सांगितले की, आता सैन्याने पूर्व स्थितीत यावे. तरीही चीन भारताच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. मुख्य सचिवालयातल्या सुरक्षा दलाच्या वक्तव्याने तर वास्तव समोर आले. त्यांनी संसदेच्या लोक लेखा समितीला सांगितले की, देशातली सशस्त्र सेना वास्तविक नियंत्रण रेषेवर ( एलएसी) कोणत्याही प्रकारच्या घटनांचा सामना करायला तयार आहे. ती दीर्घ काळ अगदी थंडीच्या दिवसातही तयार आहे.
लडाखमधला हिवाळा सैनिकांसाठी खूपच कठीण असतो. गोठवणारी परिस्थिती असते. त्यावेळी ऑक्सिजनची पातळी आपल्या शहरांतल्या ऑक्सिजनपेक्षा अर्धी असते. अगदी पाण्यासारखी मूलभूत गरजही भागवली जात नाही. सगळे काही गोठल्यामुळे पाणी मिळणेही दुरापास्त असते. पाच ते सहा महिने प्रत्येक हिवाळ्यात लडाखचा देशाशी संबंध तुटलेला असतो. कारण लडाखकडे जाणारे दोन रस्ते रोहतांग आणि झोजीला हे पूर्ण बर्फाच्छादित असतात.
हिवाळा हा सैनिकांची परीक्षा पाहणारा ठरतो. पण खरे आव्हान असते ते लष्करी नियोजन करणाऱ्यांसमोर. कारण ‘ रस्ता बंद ’ काळात लष्कराला सर्व सुविधांसह सज्ज राहावे लागते. दर वर्षी लष्कराला हा मोठा लॉजिस्टिक एक्झरसाइज करावा लागतो आणि याला ‘ अॅडव्हान्स विंटर स्टॉकिंग ’ ( एडब्लूएस ) म्हटले जाते. या काळात पुढच्या सहा महिन्यांमध्ये सैनिकांना आवश्यक असणाऱ्या प्रत्येक वस्तूची खरेदी आणि वाहतूक केली जाते. कारण नंतर लडाखला येणारे रस्तेच बंद होणार असतात.
अनेक महिने आधी ही तयारी सुरू होते. अगदी गरजेच्या छोट्या-छोट्या गोष्टींही मोजल्या जातात. टुथब्रशपासून कपड्यांपर्यंत, टिनमधले अन्न, रेशन, इंधन, औषधे, दारूगोळा, सिमेंट, तंबू इत्यादी गोष्टी आणल्या जातात. सीमा रस्ते संघटना लडाखला येणाऱ्या दोन रस्त्यांवर साचलेला बर्फ काढण्यात व्यग्र असली तरीही पठाणकोट आणि जम्मू इथून डेपोत वस्तू यायला लागतात. एकदा का रस्ते सुरू झाल्याची घोषणा झाली ( मेच्या आसपास ) की स्टोअर करायच्या वस्तू घेऊन पहिले वाहन लडाखला रवाना होते.
झोजी लावरून लेहला जाऊन परत यायला 10 दिवस लागतात आणि रोहतांग मार्गावरून 14 दिवस लागतात. दोन्ही रस्त्यांवर संक्रमण शिबिरे आहेत. तिथे ड्रायव्हर्स रात्री आरामासाठी थांबू शकतात. दोन आठवड्याच्या प्रवासात वाहनचालक वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीची विश्रांती घेतात. एक ट्रिप संपली की दुसरी सुरू होण्याआधी वाहनचालकाला दोन दिवस सुट्टी मिळते. पुढच्या सहा महिन्यांसाठी त्याच्यासाठी हे रुटिन असते. वाहनचालक एका हंगामात अतिशय खडतर रस्त्यावरून 10 हजार किमी. वाहन चालवतो. सैन्य वाहतूक ही भाड्याने घेतलेल्या स्थानिक ट्रक्स आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या इंधन टँकर्सद्वारे होते.