मुंबई : मुंबईहून व्हिएतनामधील हो ची मिन्ह सिटीला जाणाऱ्या व्हिएतजेटची सेवा कोलमडली आहे. विमानात बिघाड झाल्यामुळे गेल्या 10 तासापासून विमान जमीनवरच आहे यामुळे मुंबई विमानतळावर 300 प्रवाशी अडकले आहेत. 10 तासापासून या प्रवाशांना साधे अन्न- पाण्याची सुविधा सुद्धा पुरवण्यात आलेली नाही,असा आरोप प्रवाशांनी केला आहे.
300 प्रवाशी अन्न-पाण्याविना : विशेष म्हणजे प्रवाशांची गैरसोय होत असूनही विमान कंपनीकडून अद्याप कोणतीच सुविधा पुरवली गेलेली नाही. मुंबई विमानतळावर 300 प्रवाशी अन्न, पाण्याविना 10 तासापासून अडकून बसले आहेत. विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना राहण्यासाठी विमान कंपनीने कोणत्याच हॉटेलमध्ये सोय केलेली नाही. परंतु डीजीसीएच्या नियमांनुसार, विमान कंपन्यांना निर्धारित वेळेपेक्षा जास्त उशीर झाला तर प्रवाशांना जेवण आणि राहण्याची व्यवस्था करणे बंधनकारक असते. दरम्यान प्रवाशी व्हिएतजेटकडे तक्रार केली असून विमान कंपनीच्या उत्तराची वाट पाहत आहेत. परंतु कंपनी कधी उत्तर देईल किंवा मदत करेल याची हमी अद्याप प्रवाशांना नाही. याशिवाय पर्यायी विमान उपलब्धल केले जाणार का नाही याची ही शाश्वती या प्रवाशांना देण्यात आलेली नाही.
प्रवाशाने सांगितली आपबीती :गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता प्लाइट VJ-884 हे विमान मुंबईकडून हो ची मिन्ह सिटीकडे उड्डाण घेणार होते. परंतु हे विमान अद्याप जमिनीवरच आहे. दरम्यान याविषयी माहिती देताना एक प्रवाशी म्हणाला की, मला या विमानाने व्हिएतनाममार्गे बालीला जायचे होते. तर आमची रात्री 11 वाजता बोर्डिंग झाली. आम्ही विमानात बसलो होतो. अर्धा तास होऊनही विमानाने उड्डाण न घेतल्याने आम्ही वैमानिकांना याचे कारण विचारले. विमानात काहीतरी बिघाड झाला आहे. हा बिघाड दुरुस्त झाला की काही वेळात उड्डाण भरली जाईल, उत्तर विमानातील कर्माचाऱ्यांनी दिले.
कोणतीच सुविधा नाही : अद्याप विमानाची दुरुस्ती झालेली नाही. प्रवाशी अजूनही विमानतळावर अडकून पडले आहेत. बालीला जाणारा प्रवाशी पुढे म्हणाला की, रात्री 11.30 वाजेपासून ते पहाटेच्या 5 वाजेपर्यंत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना इमिग्रेशन क्षेत्रात बसवून ठेवले. परंतु अडकलेल्या प्रवाशांना त्यांनी अन्न, पाण्याची कोणतीच सोय उपलब्ध करुन दिली नाही. विशेष म्हणजे हो ची मिन्ह सिटीला जाण्यासाठी कुठल्या पर्यायी विमानाविषयीही काहीच कल्पना दिलेली नाही.
हेही वाचा -
- Delhi Bangkok Flight Delay : एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्यामुळे 300 प्रवाशांना झाला त्रास, खाण्यापिण्याच्या व्यवस्थेवर आरोप
- PM Modi Returns To India : तीन देशाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले, भाजपने केले जंगी स्वागत