महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'ओआयसी'मधील कोणत्याही देशाने भारत-पाकदरम्यान मध्यस्थी करण्याची 'ऑफर' दिली नाही - परराष्ट्र मंत्रालय

पाकिस्तानने भारताला सन्माननीय अतिथीपद दिल्यानंतर सभेवर टाकलेला बहिष्कार आणि भारताने दहशतवादाविरोधात घेतलेली कडक भूमिका पाहता भारत-पाकिस्तानचे परस्परविरोधी प्राधान्यक्रम दिसत आहेत.आता 'ओआयसी'मधील कोणत्याही देशाने या दोन शेजारी देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीची ऑफर दिली नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

By

Published : Mar 2, 2019, 10:56 AM IST

सुषमा स्वराज

अबू धाबी - 'ओआयसी'मधील कोणत्याही देशाने भारत-पाकदरम्यान मध्यस्थी करण्याची 'ऑफर' दिली नाही, असे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुस्लीम सहकार संघटनेची (ओआयसी) ४६वी सभा झाली. संघटनेतील उपस्थित मुस्लीम देशांपैकी कोणत्याही देशाच्या परराष्ट्र मंत्र्याने या दोन शेजारी देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थीची ऑफर दिली नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. याचे प्रतिबिंब मुस्लीम सहकार संघटनेच्या (ओआयसी) ४६व्या सभेदरम्यानही दिसले. भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना १ आणि २ मार्च दरम्यान होणाऱ्या ओआयसीच्या सभेसाठी 'सन्माननीय पाहुण्या' म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ओआयसीमध्ये ५७ देशांचा समावेश आहे. येथे 'सन्माननीय पाहुणे' म्हणून भारताला आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. येथे द्वीपक्षीय चर्चाही होणार आहे. मात्र, यामुळे पाकला दणका बसला आहे. स्वराज उपस्थित राहणार असतील तर पाकिस्तान सभेवर बहिष्कार टाकेल, अशी धमकी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पत्राद्वारे ओआयसीचे महासचिव यूसेफ बिन अहमद अल-ओथाइमेन यांना दिली होती. मात्र, या धमकीकडे कुणीही लक्ष न दिल्याने त्यांची चांगलीच नाचक्की झाली. तरीही पाकने सभेवर बहिष्कार टाकलाच. यामुळे भारत-पाक संबंधांतील तणाव इतक्यात निवळण्याची चिन्हे नाहीत. असे असले तरी, कोणत्याही मुस्लीम देशाने भारत-पाकदरम्यान मध्यस्थी करण्यात रस दाखविलेला नाही किंवा तसा प्रयत्न केलेला नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

सभेच्या पहिल्या दिवशी झालेल्या भाषणात सुषमा स्वराज यांनी 'जगात मानवतेच्या रक्षणासाठी दहशतवादाला आश्रय देणे आणि खतपाणी घालणे थांबवले पाहिजे,' असे म्हणत पाकिस्तानवर वार केला होता. 'कोणत्याही धर्माचा विकृतपणे लावलेला अर्थ दहशतवादाला चालना देतो. 'दहशतवादाविरोधात लढा' म्हणजे कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधातील लढा नव्हे. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाहच्या ९९ नावांपैकी कोणत्याही नावाचा अर्थ 'हिंसा' असा नाही. त्याचप्रमाणे इतर सर्व धर्मही शांततेचाच संदेश देतात. भारतातील ऋग्वेदानेही परमेश्वर एक असल्याचे सांगतानाच प्रत्येकाने त्याचे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केल्याचे सांगितले आहे,' असे सांगत दहशतवाद आणि त्याच्या आश्रयदात्या देशांना चपराक लगावली होती. पाकिस्तानने भारताला सन्माननीय अतिथीपद दिल्यानंतर सभेवर टाकलेला बहिष्कार आणि भारताने दहशतवादाविरोधात घेतलेली कडक भूमिका पाहता भारत-पाकिस्तानचे परस्परविरोधी प्राधान्यक्रम दिसत आहेत.

याआधी सौदी अरबचे राजे मोहम्मद बिन सलमान आधी पाकिस्तानात आणि नंतर भारतात आले असताना त्यांनीही फारशी ठोस भूमिका घेतली नव्हती. त्यांनी पाकिस्तानात २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. तर, भारतात आल्यानंतर दहशतवाद हा भारतासह आमचाही समान शत्रू असल्याचे म्हणत दोन्ही दगडांवर पाय ठेवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details