मुंबई - व्हॅलेंटाईन डे च्या आसपास अनेक प्रेमगीतं प्रदर्शित होत असतात. आता याच डे चा मुहूर्त साधत, व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला, 'घर बंदूक बिरयानी' मधील प्रेमाची चाहूल देणार पहिलं गाणं, 'गुन गुन' प्रदर्शित करण्यात आलं आहे. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलेल्या या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. 'गुन गुन' या प्रेमगीताच्या माध्यमातून आकाश ठोसर आणि नवा चेहरा सायली पाटील या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज या गाण्यातून बघायला मिळतोय.
या गीताबाबत संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणाले, "नागराज मंजुळे यांच्या सिनेमातील रोमँटिक गाणी ही नेहमीच मनाला भिडणारी असतात. गाण्याची प्रत्येक फ्रेम सुंदर असते. एका अनोख्या पद्धतीने गाण्यांचे चित्रीकरण केले जाते, जे नजरेला सुखावणारे असते. त्यामुळे त्या गाण्याच्या शब्दांना अधिक श्रवणीय करण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रेमाची एक वेगळीच गंमत त्यांच्या गाण्यात अनुभवायला मिळते. प्रेमात एक वेगळीच जादू असते, ती जादू पुन्हा एकदा आपल्याला या 'गुन गुन' या प्रेमगीतातून अनुभवता येणार आहे.''
नागराज पोपटराव मंजुळे म्हणाले, 'ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी या चित्रपटातील संगीतासाठी मागील चार वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतली आहे. जीव ओतून काम केलं आहे. मला असं वाटतं, कोणत्याही चित्रपटाचा संगीत हा आत्मा असतो. ज्या गोष्टी कथेतून सांगता येत नाहीत त्या संगीतातून व्यक्त होतात आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी मनापासून केला आहे. मला खात्री आहे, प्रेक्षक हे गाणं नक्कीच गुणगुणतील.