महाराष्ट्र

maharashtra

Nana Patekar interview : 'स्टार्स' आणि स्टार्स चे 'स्टार्स' बदलवणारा शुक्रवार : नाना पाटेकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 1:17 PM IST

Nana Patekar interview : नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यानिमित्तानं त्यांनी अनेक विषयावर गप्पा मारल्या. कोविड काळातील अनुभव सांगताना मुलाच्या इच्छेखातर लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच आजच्या स्टारच्या भविष्याबद्दल बोलताना त्यांनी काढलेले उद्गार लक्ष वेधणारे आहेत.

Nana Patekar interview
नाना पाटेकर

मुंबई - Nana Patekar interview : नाना पाटेकर म्हणजे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील भारदस्त व्यक्तिमत्व. त्याने आपल्या जबरदस्त अभिनय प्रतिभेनं दबदबा निर्माण केलेला आहे. चित्रपटाशी निगडित प्रत्येकाने प्रामाणिकपणे उत्तम काम करावं हा त्यांचा नेहमीच अट्टहास राहिला आहे. जितका संवेदनशील अभिनेता तितकाच प्रेमळ स्वभाव असलेल्या या अभिनेत्याला काहीही थातुर मातुर केलेलं आवडत नाही. अलीकडच्या काळात नाना चित्रपटांतून फारसा दिसला नाही. बऱ्याच काळानंतर त्याची प्रमुख भूमिका असलेला 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी नाना पाटेकरशी संवाद साधला आणि त्याला बोलतं केलं.



बऱ्याच कालावधीनंतर तुमचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडणार आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' बद्दल काय सांगाल?
सर्वात महत्वाचं म्हणजे असा चित्रपट करावासा वाटला याबद्दल लेखक, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयाचा आपल्या देशाबद्दलचा अभिमान वृद्धिंगत करेल. बलराम भार्गव जे व्हॅक्सिन टीमचे प्रमुख होते. व्हॅक्सिन तयार करताना गुप्तता बाळगली होती आणि अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली होती. आपल्या शास्त्रज्ञांनी केलेली मेहनत जगासमोर आणणे गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. पण आपल्या शास्त्रज्ञांनी नेटाने व्हॅक्सिन बनवलं आणि त्याचा भारताबरोबर इतर अनेक देशांना कोरोना लढ्यात फायदा झाला.

तर, विवेक (अग्निहोत्री) हे स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला विचारलं की मीच का? त्यावर तो उत्तरला की, यात एक वाक्य आहे, इंडिया कॅन डू इट आणि हे वाक्य तूच कन्विन्सिंगली बोलू शकशील. मी लगेच होकार दिला. परंतु यात बऱ्याच सायंटिफिक गोष्टी आहेत, असं मी सांगितल्यावर त्याने दिलासा दिला, 'मी आहे ना'. मी संपूर्ण चित्रपट त्याच्यावर भिस्त ठेऊन केला. तसंच मी ज्यांची भूमिका करतोय डॉ बलराम भार्गव, त्यांना मी भेटलोही नाही. एकतर वेळ नव्हता आणि मला त्यांना भेटून भूमिकेचं माझ्या मनातलं चित्र धूसर करायचं नव्हतं.

आम्ही हल्लीच त्यांना हा चित्रपट दाखवला आणि ते खूप इम्प्रेस झाले. मला त्यांनी विचारलं की मला न भेटता तुम्ही एवढी प्रभावी व्यक्तिरेखा कशी साकारली? मी फक्त विवेककडे बोट दाखवले आणि म्हणालो, सगळं श्रेय याला जातं. आमच्याकडे ७-८ महिने असते तर मी नक्की त्यांना भेटलो असतो. त्यांची देहबोली अथवा बोलण्याची पद्दत कॉपी करण्यासाठी नव्हे तर त्यांची वैचारिक मानसिकता जाणून घेण्यासाठी.

तुमचा कोरोना कालखंडाचा अनुभव काय होता?
कोरोना काळ खूप वाईट होता. एकमेकांकडे जाणं येणं बंद होते. परंतु मी मात्र प्रवास केला. 'नाम फाउंडेशन'च्या कामानिमित्त बाहेर जाणं होत होतं. मी बिहारलाही जाऊन आलो. मी सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी बिहारला गेलो होतो. मला तर ६ - ७ वेळा कोरोना होऊन गेला. एकदाच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्याकडील पाहुण्याची खूप सरबराई केली की तो जास्त काळ राहतो. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की लगेच निघून जातो. कोरोनाबाबतही मी हेच केलं.

तुम्ही 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट केलाय. तुम्ही स्वतः व्हॅक्सिन घेतलं का?
हो. दोन्ही डोस घेतले. अर्थात मी घेण्यासाठी राजी नव्हतो. कारण मला माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती जोखायची होती. पण माझा मुलगा घाबरला होता आणि साहजिकच आहे. कारण त्यावेळेला असेही दाखवत होते की, मेल्यावर पार्थिवही नातेवाईकांना दिलं जात नव्हतं. मुलाच्या आग्रहाखातर मी व्हॅक्सिन घेतलं.

कोरोना कालखंड आणि विलगवास हे आपण सर्वांनी अनुभवले आहे. 'क्वारंटाईन' हा शब्द खूप प्रचलित झाला. परंतु लॉकडाऊनमध्ये एकांतात राहणं महत्वाचं ठरलं होतं. (हसत) तसं
बघायला गेलं तर माझा कायमचा 'क्वारंटाईन' सुरु आहे. मी हल्ली मुंबईत राहत नाही. आताची मुंबई मला आपली वाटत नाही. त्यामुळे मी माझ्या फार्म हाऊसवर राहतो. माझ्या सोबतीला ५ कुत्रे आहेत, तसंच १२ गायी आणि २ बैल आहेत. १२-१४ एकरच्या फार्मवर एक फेरी मारायलाच एक दीड तास लागतो. माझे कुत्रे गावठी असले तरी आक्रमक आणि उग्र आहेत. त्यामुळे तिथे आजूबाजूला कोणी फिरकत नाही. त्यामुळे माझा कायमचा विलगवास सुरु आहे.


तुम्ही चित्रपट कसे निवडता?
मला जर संहिता आवडली आणि मनाजोगे पैसे मिळत असतील तरच चित्रपट स्वीकारतो. चित्रपट काहीतरी बोलला पाहिजे. नाहीतर नुसतंच मनोरंजन करणारा असला पाहिजे, जसा मी 'वेलकम' केला होता. अभिनेत्याने रोज काहीतरी नवं शिकायला हवं. नटाची रोज परीक्षा असते. आधी ४००-५०० कोटींचा चित्रपट देणाऱ्या नटाचा पुढचा चित्रपट फ्लॉप ठरू शकतो. आता दर शुक्रवारी 'स्टार्स' आणि स्टार्सचे 'स्टार्स' बदलत असतात. अभिनयाने समृद्ध असेल तो चांगला अभिनेता बनू शकतो. सुख आणि दुःख यांच्या व्याख्या रोज बदलायला हव्या. प्रत्येकाचे अश्रू वेगळे असतात. त्यामुळे जे स्क्रिप्ट आवडत नाही ते मी करत नाही, इतकं सोप्पं आहे.

तसंच माझे अनेक निर्मात्यांकडे पैसे बाकी आहेत. मीच ठेवले आहेत वा मागत नाही. जेव्हा चित्रपट करावासा वाटेल तेव्हा त्यांना फोन करू शकतो. 'नाम फाउंडेशन'चं काम वाढत चाललं आहे. आता 'नाम फाउंडेशन' महाराष्ट्रापुरतं राहिलेलं नाहीय. आम्ही आता काश्मीर, जयपूर, गौहत्ती वगैरे ठिकाणीही पोहोचलो आहोत. कारण सर्व भारतवासी आमचेच आहेत.

हेही वाचा -

1. Nayanthara : नयनतारा आणि विघ्नेशनं क्वालालंपूरमध्ये साजरा केला आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस...

2.Tumse Na Ho Payega screening : 'तुमसे ना हो पायेगा'च्या स्क्रिनिंगला कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची हजेरी - पाहा व्हिडिओ

3.Parineeti Chopra Raghav Reception : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका झाली लीक...

ABOUT THE AUTHOR

...view details