महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 21, 2021, 4:20 PM IST

Updated : Jun 28, 2022, 9:09 AM IST

ETV Bharat / entertainment

मराठी चित्रपट ‘जयंती’ने बॉलिवूड चित्रपट ‘अंतिम’ बरोबरचा टाळला प्रदर्शन-क्लॅश!

मराठी चित्रपट "जयंती" येत्या २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याच्या वाटेवर होता. परंतु, बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट "अंतिम" नेमका २६ नोव्हेंबर रोजीच प्रदर्शित होत असल्याची अचानक घोषणा झाली. या निर्णयामुळे महाराष्ट्रात परत मराठी चित्रपटांची गळचेपी होतेय की काय अशी विचारणा होऊ लागली.

मराठी चित्रपट जयंती
मराठी चित्रपट ‘जयंती’

कोरोना महामारीने चित्रपटसृष्टीचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले होते. परंतु त्याआधी प्रत्येक शुक्रवारी एकापेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होणे हे नित्याचे झाले होते. फक्त एखादा मोठे बॉलिवूड चित्रपट रिलीज होत असताना इतर चित्रपट त्यासोबतच प्रदर्शन-क्लॅश टाळत असत. आता कोरोना परिस्थिती निवळत असताना महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा उघडत आहेत आणि साहजिकच प्रदर्शनासाठी सिनेमांच्या रांगा लागल्यात यात नवल नाही. हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिल्यामुळे मराठी चित्रपटांची गोची होते अशी ओरड मराठी चित्रपट निर्मात्यांकडून वेळोवेळी केली जात होती. आता पुन्हा तीच परिस्थिती उद्भवलीय असे म्हणायला जागा आहे. एक चित्रपट विश्लेषक सांगतात की, खूप आधीपासून चालत आलेल्या बॉलिवूड सिनेमांच्या "दादागिरी"चे मराठी चित्रपट नेहमीच "शिकार" बनतात आणि चांगल्या विषयाचे मराठी भाषिक सिनेमे याच कारणामुळे प्रेक्षकांपासून वंचित राहतात.

सरकारने चित्रपटगृहे सुरु करण्यास दिलेली परवानगी तसेच दिवाळीच्या ऐन मोक्यावर निर्माण झालेले उत्साही वातावरण, यामुळे तब्बल २० महिन्यांच्या कालावधी नंतर प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये नक्कीच गर्दी करणार या आनंदात असलेले मराठी चित्रपट निर्माते तसेच दिग्दर्शक अचानक पणे झालेल्या एका बॉलिवूड चित्रपटाच्या एंट्री मुळे प्रश्नात पडले आहेत. सर्व प्रकारचे परिपूर्ण नियोजन करून प्रदर्शनाची तारीख जवळपास ८ आठवडे अगोदर जाहीर करून सर्वत्र चर्चा झालेला मराठी चित्रपट "जयंती" येत्या २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याच्या वाटेवर होता परंतु बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट "अंतिम" नेमका २६ नोव्हेंबर रोजीच प्रदर्शित होत असल्याची अचानक घोषणा झाली आणि परिणामी या निर्णयामुळे महाराष्ट्रात परत मराठी चित्रपटांची गळचेपी होतेय की काय अशी विचारणा होऊ लागली.

वैश्विक महामारी मुळे जग थांबले असताना चित्रपटसृष्टीला देखील बऱ्याच काळापुरता विराम लागला होता पण आता परिस्थिती पूर्ववत येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने चित्रपट प्रदर्शनाच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आणि मराठी चित्रपट निर्मात्यांना थोडासा का होईना पण दिलासा मिळाला. २६ नोव्हेबंर ला येणाऱ्या "अंतिम" या बॉलिवूड चित्रपटामुळे त्याच तारखेला येणाऱ्या "जयंती" सिनेमाला मात्र याचा फटका बसला असता. जर 'जयंती'ने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असती तर "गोदावरी" हा मराठी चित्रपट आहे आणि एक पाऊल मागे टाकले तर "झिम्मा" हा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

बॉलिवूड जिथे मराठी चित्रपटांचा विचार न करता सरसकट निर्णय घेतय तिथे 'जयंती'च्या निर्मात्यांनी चित्रपटांच्या शर्यतीचा फटका बाकी मराठी चित्रपटांना बसू नये यासाठी आपल्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख आता १२ नोव्हेंबर अशी ठरवली असावी हे त्यांनी सोशल मीडियाद्वारे जारी केलेल्या पोस्टद्वारे समजून येते. चित्रपटाबद्दल प्रबोधन, प्रमोशन तसेच जाहिरातींसाठी निर्मात्यांकडे खूपच कमी अवधी जरी असला तरी चित्रपटाचे नाव आणि विषय या जोरावर ते हे आव्हान पेलवत आहेत असे दिसून येते.

दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित "जयंती" आणि ऋतुराज वानखेडे आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे अभिनित हा दर्जेदार मराठी सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - Money Laundering Case : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनची चौकशी, नेमकं प्रकरण काय आहे?

Last Updated : Jun 28, 2022, 9:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details