महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनामुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट; लग्नसमारंभावर आधारित व्यवसाय अडचणीत - कोरोनाचा लग्नपत्रिका छपाईला फटका

कोरोनाच्या काळात लग्न सोहळे रद्द झाल्याने आणि मर्यादित वऱ्हाडी उपस्थित राहण्याच्या र्निबधांमुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट झाली आहे. कोरोनामुळे प्रत्येकावरच आर्थिक संकट ओढावले आहे. ऑनलाइन आमंत्रण दिल्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे. त्यामुळे आताच्या काळात लग्नाच्या पत्रिकेची जागा ऑनलाइन पत्रिकेने घेतली आहे.

ठाणे
ठाणे

By

Published : Dec 20, 2020, 5:13 PM IST

ठाणे - कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. आता कोरोनाच्या काळात लग्न सोहळे रद्द झाल्याने आणि मर्यादित वऱ्हाडी उपस्थित राहण्याच्या र्निबधांमुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट झाली आहे. यापूर्वी तीनशेहून अधिक लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिल्या जात होत्या. मात्र, आता केवळ 30 ते 40 पत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात आहे.

कोरोनामुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच लग्न कार्यक्रम साजरे करण्यावर र्निबंध आले आहेत. यामुळे पूर्वीसारखे मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम होत नसल्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत.

लग्नपत्रिका छपाईत घट...

लग्न सोहळ्यावर विविध व्यवसाय अवलंबून असून सध्या लग्न सोहळा साध्या पद्धतीने होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केवळ 20 जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्यास राज्य शासनाने सुरुवातीला परवानगी दिली होती. त्यामुळे अनेकांनी लग्न सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका लग्न सोहळ्यावर अवलंबून असलेल्या पत्रिका छपाई, सभागृह, मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक अशा सर्वच व्यवसायांना बसला.

30 ते 40 लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर -

टाळेबंदीपूर्वी एका लग्न सोहळ्यासाठी 300 हून अधिक लग्नपत्रिका छपाई करण्याची ऑर्डर वधू आणि वराच्या कुटुंबीयांकडून दिली जात होती. मात्र, आता लग्नाला उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने अनेक जण समाजमाध्यमांवरून ठराविक वऱ्हाडींना लग्नाचे निमंत्रण देत आहे. तसेच सप्टेंबर महिन्यानंतर टाळेबंदी आणखी शिथिल करण्यात आली. त्यात लग्न सोहळ्याकरिता 50 वऱ्हाडींना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वर आणि वधूच्या कुटुंबांकडून केवळ 30 ते 40 लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

लग्न पत्रिकेची जागा ऑनलाइन पत्रिकेने घेतली -

कोरोनामुळे लग्न सोहळा ठरावीक वऱ्हाडींच्या उपस्थितीत पार पडत असल्याने अनेक जण मित्रमंडळींना किंवा परिचितांना लग्नाचे निमंत्रण पत्रिकेद्वारे देण्याऐवजी समाजमाध्यमांद्वारे देत आहेत. कोरोनामुळे प्रत्येकावरच आर्थिक संकट ओढावले आहे. ऑनलाइन आमंत्रण दिल्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे. त्यामुळे आताच्या काळात लग्नाच्या पत्रिकेची जागा ऑनलाइन पत्रिकेने घेतली आहे.

हेही वाचा -भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details