ठाणे- वाहतूक कोंडी होण्याच्या काळात म्हणजेच ऐन घाई गर्दीच्या वेळामध्ये कोणतेही चलान वाहतूक पोलिसांकडून कापले जाणार नाही, असा महत्वाचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. कारण चलान कारवाईमुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यासाठी वाहतूक पोलिसांनी ही नवीन शक्कल लढवली आहे. महत्वाचे म्हणजे गुगल मॅपचा उपयोग करून आता ठाण्यातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचीही माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी म्हणजेच ऐन घाई गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांनी फक्त वाहतूक कोंडी होणार नाही आणि वाहतूक सुरळीत कशी सुरू राहील याकडेच लक्ष ठेवायचे आहे. यावेळी कोणतेही चलान कापायचे नाही, कोणत्याही वाहनावर चलान कापून कारवाई करू नये कारण या कारवाई दरम्यानही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेतला आहे, असे अधिकारी सांगत आहेत.
गुगल मॅपचाही होणार वापर-
वाहतूक विभागाच्या कंट्रोल रूममध्ये गुगल मॅपचा उपयोग करून कुठे वाहतूक कोंडी आहे. किंवा कुठे वाहतूक कोंडी होऊ शकते, हे पाहून लागलीच त्या संबंधित अधिकाऱ्याला या बाबतच्या सूचना करण्यात येणार आहेत. म्हणजेच आता वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गुगल मॅपचा उपयोग ठाणे पोलीस करणार आहेत. तर वाहनाचा मेंटेनंस नीट ठेवावा या बाबत संबंधित विभागाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. कारण दिवसाला ठाण्यात जवळपास १५ ते २० वाहन अचानक रस्त्यावर बंद पडतात आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी होते. यासाठी वाहन धारकांनी वाहनाच्या मेंटेनंसकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मेट्रो विभागालाही ज्या ठिकाणी कामे पूर्ण झालीत, त्या ठिकाणचे रस्ते मोकळे करण्याच्या सूचनाही वाहतूक विभागाने केल्या आहे.