महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुर्यग्रहण हा नैसर्गिक अविष्कार, ग्रहणाचे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घ्यावे - दा. कृ. सोमण

चालु वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज गुरुवारी होणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातील काही भागातून दिसणार आहे, तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

By

Published : Dec 26, 2019, 9:02 AM IST

Astronomer Da kru Soman
दा. कृ. सोमण

ठाणे -खगोलशास्त्रात सूर्यग्रहणाला मोठे महत्त्व आहे. असाधारण अशा खगोलीय घटनाक्रमामुळे सूर्यग्रहण घडून येते. अतिशय नैसर्गिक अशी ही क्रिया आहे. दक्षिणेतील केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमधून दुर्मीळ असे कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. तर राज्यभरातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ग्रहण म्हणजे शुभ-अशुभ असे काही नसून नैसर्गिक अविष्कार आहे. त्यामुळे ग्रहणाचे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घेतले पाहिजे, असे सोमण यांनी म्हटले आहे.

ग्रहणाचे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घ्यावे - दा. कृ. सोमण

हेही वाचा... मुंबईत पुन्हा बरसल्या सरी; नागरिकांच्या नाताळाच्या उत्साहावर पाणी

खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार आकृती दिसतच राहते. याला ‘ फायर रिंग ‘ असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. आज गुरुवार २६ डिसेंबर रोजी अशी कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील काही भागात सकाळी सुमारे दोन ते तीन मिनिटे दिसणार आहे. त्यामुळे अनेक खगोलप्रेमी या भागात ग्रहण निरिक्षण करण्यासाठी गेले आहेत.

हेही वाचा... चर्चगेट स्टेशनला 'चर्चगेट' हे नाव कसे पडले माहिती आहे का..?

महाराष्ट्रातून ग्रहणदर्शन

महाराष्ट्रातून सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेला दिसणार आहे. गुरुवारी मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झालेला दिसेल. ग्रहणमध्य सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. चंद्रग्रहण जिथून दिसते त्यावेळी सर्व ठिकाणांहून एकाचवेळी ते दिसत असते.

हेही वाचा... साखर क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा अव्वल क्रमांकावर आणायचे आहे - शरद पवार

सुर्यग्रहण पाहताना घ्यावयाची काळजी

सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण ग्रहणचष्म्यातूनच पहावे. किंवा थेट सूर्याकडे न पाहता गोलाकार छिद्र असलेल्या चाळणीतून सफेद कागदावर सूर्याची प्रतिमा घेऊन त्यामध्ये ग्रहणाचे निरिक्षण करावे. दुर्बिण किंवा द्विनेत्रीतून पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा.

आपल्याकडे ग्रहणाविषयी अनावश्क गैरसमज - सोमण

आपल्याकडे ग्रहणाविषयी अनेक गैरसमज आहेत. ग्रहण पाहू नये, ग्रहणात जेवू नये, ग्रहणकालात झोपू नये, असे समजले जाते. त्यात काहीही तथ्य नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. ग्रहणे हा नैसर्गिक अविष्कार आहे. तो सावल्यांचा खेळ आहे. ग्रहणाचे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घेतले पाहिजे, असे सोमण यांनी म्हटले आहे. कोणत्या राशीला हे सूर्यग्रहण शुभ आहे ? असा प्रश्न विचारताच दा. कृ. सोमण म्हणाले की जे लोक हे सूर्यग्रहण काळजीपूर्वक निरीक्षण करतील त्यांच्या राशीला हे सूर्यग्रहण शुभ आहे, असे म्हटले. 2019नंतर पुढच्या वर्षी २१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा व उत्तराखंड या राज्यातील प्रदेशातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून त्यावेळीही खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.

हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवारांच्या हातातील कठपुतळी - निलेश राणे

ABOUT THE AUTHOR

...view details