ठाणे - जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांकडून शेतातील खळ्यावर भाताच्या पेंढ्या बांधण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात एक शेतकरी कुटुंब खळ्यावर काम करत असतानाच, एक नव्हे तर तब्बल ३ विषारी घोणस प्रजातीचे साप त्यांना पेंढ्यांमध्ये आढळून आले. घाबरलेल्या या कुटंबीयांनी सर्पमित्रांसोबत संपर्क साधला. यानंतर सर्पमित्रांनी तिथे येऊन त्या सापांना पकडले आणि जीवदान दिले.
हेही वाचा... समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार
भक्ष्याच्या शोधात आणि बदलत्या वातारणामुळे विषारी-बिन विषारी सापांनी मानवी वस्तीत शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ३ महिन्यात सर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो सापांना पकडून जंगलात सोडले. सोमवारी सापर्डे गावात दादाजी पाटील यांच्या भात शेतातील खळ्यावर भाताचे भारे रचून ठेवण्यात आले होते. या भाऱ्यातील काही पेंड्या भात झोडणीसाठी काढण्याचे काम सुरु होते. ते करत असतानाच त्यांना पेंढ्यात एक नव्हे तर तब्बल ३ विषारी साप असल्याचे दिसून आले. साप पाहून घाबरलेल्या पाटील यांच्या कुटंबाने तेथून पळ काढला.