ठाणे - एकीकडे आमदारांना घरे देण्यावरून राज्यात वातावरण तापले असताना ठाण्यातील सातशे पोलिसांचे कुटुंबीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पत्रामुळे हवालदिल झाले आहेत. ठाणे शहरातल्या पोलिस वसाहतीमधील पंधरा इमारती धोकादायक झाल्याने त्या तात्काळ खाली कराव्यात अशा आशयाचं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस आयुक्तांना दिले आहेत आणि या पत्रानंतर आता या सर्व पोलिस कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.
700 कुटुंबीयांसमोर प्रश्न - ठाणे शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ 1980 साली बांधण्यात आलेल्या 15 इमारती धोकादायक झाल्याने त्या तात्काळ रिकाम्या कराव्यात असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे आता या 15 इमारतींमध्ये राहणाऱ्या 700 कुटुंबियांच्या समोर नवीन घर भाड्याने घेण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. आता तात्काळ मुलांच्या शाळा नोकरीचे ठिकाण आणि सर्व काही लगेच कसे करता येईल याची चिंता या कुटुंबियांना सतावत आहे. आमदारांना न मागता घर देता मग आम्ही एवढे वर्ष भाडे भरूनही आम्हाला का घर देत नाही. आमचे कुटुंबीय नागरिकांच्या सेवेसाठी जीव धोक्यात घालून काम करतात मग आमचा घरासाठी का विचार केला जात नाही असा सवाल आता हे कुटुंबीय विचारत आहे.