ठाणे -महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींचे मावळे एकत्र करत मोगली सम्राज्याची पाळेमुळे खणून काढली, कारण औरंगजेबकडे नोकर होते तर, महाराजांकडे देव, देश आणि धर्मासाठी लढणारे मराठे होते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis visit talao pali shivaji maharaj statue ) यांनी छत्रपतींना मानवंदना दिली.
हेही वाचा -Eknath Shinde slammed Narayan Rane : कोकणातील हत्याकांडाची चौकशी झाली पाहिजे - एकनाथ शिंदे
आज शिवजयंती निमित्त देवेंद्र फडणवीस, खासदार कपील पाटील यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते तलावपाळी येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी ढोलताशांच्या गजरात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या. महाराष्ट्रावर चहू बाजूनी जेव्हा मुसलमान शासकांचे आक्रमण होत होते, तेव्हा पिचलेल्या रयतेला सोडविण्यासाठी एका क्रांतीचा जन्म झाला ज्याचे नाव शिवाजी महाराज असल्याचे फडणवीस म्हणाले. जोपर्यंत आमच्या रक्तात महाराजांचे विचार आणि प्रेरणा आहे, तोपर्यत आम्हाला कोणीच गुलाम करू शकणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संपूर्ण जगातील शिवभक्तांना त्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.