ठाणे -दिवा शहरात ठाणे पालिकेकडून अनधिकृतपणे कचरा टाकला जात आहे. तर बांधकामावर सतत कारवाई केली जात आहे. दिवा-शीळ विभागातून पालिकेत ११ नगरसेवक प्रतिनिधित्व करतात, परंतु ठाणे स्मार्टसिटी अंतर्गत घेतलेल्या कामात एक पैसाही दिवा विभागात वापरला गेला नाही. यावर नाराजी व्यक्त करत मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत ठाण्याच्या विकासात दिवा दिसत नाही, मनसे आमदाराची प्रशासनावर टीका - स्मार्ट सिटी ठाणे प्रकल्प
मनसे आमदार राजू पाटील पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. दिवा विभाग सुनियोजित पद्धतीने विकसित केल्यास येथून पालिका व राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो, या विषयाकडे देखील मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

राजू पाटील म्हणाले, की केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी प्रोजेक्ट अंतर्गत दिव्यात पाणी पुरवठ्यासाठी रि-मोडलिंग करणे, तसेच दातिवली, खिडकाळी येथील तलाव सुशोभिकरण करता आले असते, ठाण्यात विविध ठिकाणी २०० कोटींच्या वर खर्च करून खाडीकिनारा सुशोभित केला जात आहे. मग दिवा डंपिंग बंद करून तेथील खाडीकिनारा सुशोभिकरणाचा समावेश का केला नाही? दिवा रेल्वे स्टेशन परिसरात एलिवेटेड स्कायवॅाक व क्लस्टर सारखी योजना आणून दिव्याचे नियोजन करता आले असते. दिवा विभाग सुनियोजित पद्धतीने विकसित केल्यास येथून पालिका व राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो, या विषयाकडेदेखील मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
ठाणे महापालिकेची मंगळवारी ठाणे शहर स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यावेळी आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत दिवा शहरातील समस्या मांडल्या.