ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेने वेढा घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे, कल्याण-डोंबिवली महापालिका देशातील अस्वच्छ शहराच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. 'अस्वच्छ शहर' म्हणून पालिकेवर शिक्का बसला आहे. शहरावरील हा शिक्का पुसण्यासाठी, मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली मध्येही स्वच्छतेसाठी 'क्लीन-अप मार्शल' तैनात करण्यात आले आहेत. हे क्लीन-अप मार्शल सार्वजनिक ठिकाणी फिरून, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर व रस्त्यावर कचरा टाकण्याऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत. या मार्शल्सनी पहिल्याच दिवशी दिवसभरात सहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर चांगलाच चाप बसण्यास सुरुवात झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेली असली, तरी शहराची स्थिती फारशी समाधानकारक नाही. स्वच्छतेच्या बाबतीत शहराचा दर्जा कमालीचा घसरला असून, कचऱ्याचे जागोजागी साचलेले ढिग, मुसळधार पावसानंतरही नाल्यात पडलेला कचरा आणि घाणीवर घोंगवणाऱ्या माशा यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.