ठाणे - ठाण्यातील इंदिरानगर आणि सावरकरनगर मधील रहिवासी गेले दोन दिवस जीव मुठीत घेऊन जगत असून नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. या भागातील दहशतीचे कारण आहे एक तपकीरी रंगाचा भटक्या कुत्रा. कालपासून या कुत्र्याने प्रचंड दहशत माजवत जवळपास 30 ते 35 जणांना चावे घेतले असून ज्यात चार लहान मुलांचा समावेश आहे. जख्मी झालेल्या नागरिकांना येथील महानगरपालिकेच्या सावरकर नगर आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींना प्राथमिक औषधोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
पूर्ण परिसर पिंजून काढला
या परिसरात वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे कुत्रे चावण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत लेखी माहिती प्रशासनाकडे देण्यात आली असल्याची अशी माहिती आरोग्य अधिकारी श्वेता खाडे यांनी दिली आहे. सदर पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी महापालिकेचे पथक संपूर्ण परिसर पिंजून काढत असून जेव्हा या श्वानाला पकडतील तेव्हाच नागरिक सुटकेचा निश्वास सोडतील असे मनोगत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.