महाराष्ट्र

maharashtra

बेसुमार जंगलतोडीमुळे तानसा अभयारण्यातील पर्यावरणास धोका

By

Published : Jul 4, 2021, 6:31 PM IST

Updated : Jul 4, 2021, 6:43 PM IST

अभयारण्यात असलेल्या निशेत गावाच्या हद्दीतून मोठमोठी सागवान वृक्ष कटरच्या साहाय्याने कापून लाकूड माफियांनी लंपास केले आहे. वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या जंगलात लाकूड माफियांचे राज असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे.

तानसा अभयारण्य
तानसा अभयारण्य

ठाणे - शहापूर तालुक्यात सुमारे ३२० किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रात तानसा वन्यजीव अभयारण्य पसरले आहे. मात्र तानसा अभयारण्यात बेसुमार जंगलतोड होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यातच अभयारण्यात असलेल्या निशेत गावाच्या हद्दीतून मोठमोठी सागवान वृक्ष कटरच्या साहाय्याने कापून लाकूड माफियांनी लंपास केले आहे. दुसरीकडे वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या जंगलात लाकूड माफियांचे राज असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे.

तपासणी नाके असूनही लाकडांची चोरटी वाहतूक

तानसा अभयारण्यातील वन्यजीव वनपरिक्षेत्र वैतरणा हद्दीत शहापूर-वाडा मार्गावरील निशेत गावाच्या हद्दीत कंपार्टमेंट नंबर 937मध्ये बेसुमार जंगलतोड झाली असून चोरट्यानी अंधाराचा फायदा घेत खर्डी-वाडा रस्त्यालगत असलेली सागवान जातीच्या 70 वृक्षांची कटरच्या सहाय्याने कत्तल करून एका रात्रीत लंपास केली आहेत. शिवाय परिसरातील सर्व रस्त्यांवर वनविभागाचे तपासणी नाके असतानासुद्धा बिनबोभाटपणे चोरटी वाहतूक होते कशी, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या सर्व परिस्थितीला वनाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

अज्ञात लाकूडतोड माफियांविरोधात गुन्हा दाखल

याच जंगलामध्ये स्थानिक आदिवासी-शेतकरी जळाऊ सरपण आणण्यासाठी गेले असता त्यांना अटकाव करून वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हे ही दाखल केले जातात. मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असताना वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का होत आहे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. शिवाय कटरच्या सहाय्याने जंगलतोड केली असून यावरून लाकूड माफियांची मोठी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत तानसा अभयारण्यातील वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अज्ञात लाकूडतोड माफियांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस व अधिकाऱ्यांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

'वृक्षवल्ली समृद्ध राखणे गरजेचे'

शहापूर, खर्डी, वैतरणा तालुक्यातील वनश्रीने नटलेला हिरवागार परिसर व तानसा तळ्याच्या पाणलोट क्षेत्रातील हे अभयारण्य आहे. दूरवर पसरलेल्या तानसा तळ्याचा जलाशय पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. जंगलातील विभिन्न वन्य जीवसृष्टीची तहान भागवण्याचे कामही हेच तळे करते. मुंबईपासून दूर नसल्याने आठवड्यांच्या शेवटी निसर्गप्रेमींची पावले इकडे आपोआप वळतात. तानसा अभयारण्याभोवतीचे जंगल कळंब, बांबू, खैरसारख्या वृक्षवल्लीने समृद्ध आहे. मात्र निर्सगाच्या या वृक्षवल्लीची समृद्धता राखणे गरजेचे असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Jul 4, 2021, 6:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details