महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भ्रष्टाचाराचे प्रवेशद्वार; कर्जबाजारी महानगरपालिकेची प्रवेशद्वाराच्या नावावर कोट्यवधीची उधळपट्टी - मीरा भाईंदर महानगरपालिका लेटेस्ट न्यूज

निधी उपलब्ध नसताना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र शहरातील अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांवर वायफळ खर्च करण्याचा सपाटा लावला आहे.

Mira Bhayander
शहरातील प्रवेशद्वार

By

Published : Nov 28, 2020, 4:35 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर महानगरपालिका जवळपास पाचशे कोटींच्या कर्जात बुडालेली आहे. तसेच सार्वजनिक आरोग्या सारख्या अनेक अत्यावश्यक सेवेसाठी निधी उपलब्ध नसताना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र शहरातील अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांवर वायफळ खर्च करण्याचा सपाटा लावला आहे. कोट्यवधी रुपयांची लूट चालवली असल्याचा आरोप शहरातील नागरिकांकडून केला जात आहे.

शहरातील प्रवेशद्वार

शहरात नवीन प्रवेशद्वारांसाठी वायफळ खर्च

मीरा भाईंदर शहरात गरज नसताना देखील स्मशानभूमी, उद्याने, प्रशासकीय इमारती, सार्वजनिक रुग्णालये अशा विविध ठिकाणी आधीची असलेली प्रवेशद्वारे तोडून त्याठिकाणी नवीन प्रवेशद्वारे बनवून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी चालवली असल्याचा आरोप केला जात आहे. मीरा भाईंदर शहरातील परिवहन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, शालेय शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, योग्य नियोजनाअभावी योग्य ती सार्वजनिक आरोग्य सेवा देखील नागरिकांना मिळत नाही. शहराच्या कर उत्पन्नात मोठी तूट निर्माण झालेली असून निधी अभावी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन देखील वेळेवर दिले जात नाही. अशा महानगरपालिकेवर अंदाजे पाचशे कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागात मात्र वारेमाप उधळपट्टी होत आहे. शहरातील नगरसेवक, राजकीय पक्षाचे नेते, शहर अभियंता शिवाजी बारकुंड आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खंबीत यांच्या संगनमताने अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांच्या निविदा बेकायदेशीरपणे काढल्या जात आहेत, असा आरोप केला जात आहे.

शहरातील प्रवेशद्वार

आरोग्य सेवेसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही -

मीरा भाईंदर शहरासह संपूर्ण देशात कोरोनासारख्या भयंकर साथ रोगाने थैमान घातले आहे. नागरिकांच्या अत्यावश्यक आरोग्य सेवेसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. अशा कठीण परिस्थितीत देखील गरज नसलेल्या विकासकामांवर भरमसाठ खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभातील अधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदार यांचे उखळ पांढरे केले जात असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी व्यक्त केली आहे.

महानगरपालिकेतील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही - आमदार गीता जैन

मीरा भाईंदर महानगरपालिकेतील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, अशी घोषणा मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी केली. आता भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी देखील त्या राज्य शासनाकडे करतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details