ठाणे - आठ घरफोड्या, सहा वाहनांच्या चोऱ्या, एक दरोडा आणि एक अवैध शस्त्रविक्री असे तब्बल १६ गुन्हे उघडकीस आणण्यास भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तसेच या पथकाने आतापर्यंत बारा सराईत गुन्हेगारांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) एन.टी कदम, किसन गवळी, भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत आणि पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
भिवंडी गुन्हे शाखेने १७ तासांत १२ सराईत गुन्हेगारांचे १६ गुन्हे उघडकीस आणले भिवंडी शहर व तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात स्थानिक पोलीस यंत्रणेला अपयश येत आहे. अशात भिवंडी पोलीस परिमंडळ हद्दीतील विविध गुन्हातील १२ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या गुन्हेगारांकडून सोन्याचे दागिने, केबल आणि रोख रक्कम तसेच दोन पिस्तूल व काही जिवंत काडतुसे असा एकूण २४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याचा छडा अवघ्या १७ तासांत लावण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणकोली येथे प्रभात केबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामातील चोरी झाली होती. त्यात वॉचमन व कामगारांना खोलीत डांबून ठेवून १३ लाख २३ हजार ४८६ रुपयाचे केबल बंडल चोरून नेले होते. या गुन्ह्याची नोंद होताच अवघ्या १७ तासांत भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींची अटक केली. यामध्ये मुंबई जेलमधून फरार असलेला आरोपी बैतुल्ला चौधरी याच्यासह त्याचे साथीदार कबीर उस्मान शेख, स्वप्निल उर्फ गोट्या राजेंद्र पांचाळ , बबलू जंग बहादुर विश्वकर्मा, पुरण शेरबहादूर सोनार, दीपक विश्वकर्मा या आरोपींना अटक केली आहे.
दरोड्यातील मुख्य सूत्रधार बैतुल्ला हा २०१० साली रायगड जिल्ह्यातील खालापूर जेलमधुन फरार झालेला कैदी आहे. तसेच दरोड्यातील केबल घेणारा जमील मज्जिद शेख याला घाटकोपर मधून अटक केली आहे. या आरोपीकडून ८ लाख ९० हजार किंमतीचे केबल जप्त करण्यात आले आहे. तसेच घरफोड्या आणि वाहन चोऱ्यांच्या गुन्हेगारांकडून ७ लाख ७ हजार रुपये रोख तर ७ लाख २९ हजार रुपये किमतीचे २४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची ३ वाहने असा १५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.