नवी मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत परिसरात सिडकोच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातल चिंचपाडा गावातील विमानतळबाधीत प्रकल्पग्रस्तांची गावाबाहेर बांधलेली घरे सिडकोच्या माध्यमातून तोडली आहेत. सिडको अधिकारी ही कारवाई सामोपचाराने झाली असल्याचे सांगत आहेत तर ग्रामस्थ मात्र कारवाई आपल्या मर्जीने झालेली नसल्याचे सांगत आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधीत परिसरात सिडकोची अतिक्रमण विरोधी कारवाई - latest news from international airport premises
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत परिसरात सिडकोच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात चिंचपाडा गावातील विमानतळबाधीत प्रकल्पग्रस्तांची गावा बाहेर बांधलेली घरे या कारवाई अंतर्गत तोडण्यात आली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कोल्ही, कोपर, चिंचपाडा, वरचे ओवळे वाघिवलीवाडा, वाघिवली उलवे कोंबडभुजे तरघर गणेशपुरी ही गावे विस्थापित झाली आहेत. मात्र, उचित मोबदला सिडकोच्या माध्यमातून न दिल्याने काही ग्रामस्थ अजूनही गावात व गावाबाहेर घर बांधून राहत आहेत. गावाबाहेर बांधलेली घरे सिडकोने अनधिकृत ठरवली असून नवी मुंबई विमानतळ बाधीत चिंचपाडा व कोल्ही या गावाबाहेरील नाराज प्रकल्पग्रस्तांची घरे सिडकोच्या माध्यमातून अनधिकृत ठरवून आज तोडण्यात आली आहेत. या अतिक्रमण कारवाईत सिडकोच्या माध्यमातून मोठा फौजफाटा बोलवण्यात आला होता. त्यामध्ये दीडशे पेक्षा अधिक पोलीस दल या कारवाईच्या वेळी उपस्थित होते. मलेरिया डेंग्यूच्या साथीमुळे ग्रामस्थ तिथे राहत नसल्याचा फायदा घेऊन ही कारवाई केली आहे, असे विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्त चिंचपाडा गावचे नंदकुमार मुंडकर यांनी सांगितले.
आम्ही सिडकोकडे काही अवधी मागितला होता त्यात आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्यावर स्वतःच ही बांधकाम काढून टाकणार होतो. मात्र, अजुनही आमच्या मागण्यांची पूर्ती झालेली नाहीत. सिडको जर म्हणत असेल ही अतिक्रमण कारवाई नाही तर सिडको इतका फौजफाटा का घेऊन आली, असा सवालही प्रकल्पग्रस्त मुंडकर यांनी उपस्थित केला आहे. सिडकोचे मुख्य भूमापन अधिकारी संदिप माने यांनी ही अतिक्रमण कारवाई नसून लोकांनी स्वतःच्या मर्जीने ही घरे काढून टाकली आहेत असे सांगितले आहे. या संदर्भात आमची ग्रामस्थांशी सामोपचाराने बोलणेही झाले आहे, असे सांगत आहेत.