ठाणे : कल्याण डोंबिवलीतही दिल्लीप्रमाणे नागरी सुविधा उपलब्ध करून देऊन मुख्यमंत्री केजरीवाल यांचे दिल्ली सारखे मॉडेल कल्याण डोंबिवलीतही राबविणार. तसेच शहरी भागातील मतदार इतर पक्षाच्या कारभारावर नाराज असून त्यांना पर्याय म्हणून आम आदमी पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना वक्तव्य केले. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी-कार्यकर्ते मेळाव्यासाठी आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे हे कल्याणात आले होते.
मतदारांना पर्याय म्हणून आम आदमी पक्ष निवडणुकीच्या मैदानात लोककल्याणकारी व्यवस्था कशी असावी याचा धडा -
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने लोककल्याणकारी व्यवस्था कशी असावी याचा धडा सर्वच राजकीय पक्षांपुढे मांडला आहे. दिल्ली सरकारने राबविलेल्या असंख्य लोकहिताच्या योजना आज जनतेच्या कौतुकाच्या व प्रशंसेस पात्र ठरल्या आहेत. दिल्लीतील सरकारी शाळांची तुलना खासगी शाळांसोबत केली जात आहे. त्याचबरोबर घरपोच दाखले- प्रमाणपत्रे, २०० युनिट मोफत वीज, मोफत पाणी अशा सुविधांची गेल्या १० वर्षांपासून अंमलबजावणी केली जात असल्याचेही राचुरे यांनी सांगितले.
त्यामुळे आपला संधी द्या -
आजपर्यंत देशात अशा कोणत्याही योजना राबविण्याची कल्पकता आणि धाडस दाखवले नसून लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवल्यास कल्याण डोंबिवलीतही दिल्ली मॉडेल राबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. इथल्या जनतेने आतापर्यंत भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी अशा सर्वच प्रमुख प्रस्थापित पक्षांच्या कारभाराचा अनुभव घेतला असून एकाही पक्षाने 'आप'प्रमाणे स्वच्छ कारभार केलेला नाही. त्यामुळे 'आप'ला एकदा संधी असेही यावेळी प्रदेश निरिक्षक विजय कुंभार यांनी सांगितले.
'आप'ची सत्ता आल्यास विकासाची गंगा येणार -
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 'आप'ची सत्ता आल्यास मोफत पाणी, महिला-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, खड्डेमुक्त आणि सुरक्षित दर्जेदार रस्ते, महापालिकेतील टक्केवारीने बरबटलेली भ्रष्टाचारी साखळी मोडीत काढणार. फेरीवाल्यांना दोन वर्षांत फेरीवाला धोरणानुसार टप्प्याटप्प्याने जागा निर्धारित करून देणार. महापालिकेची परिवहन सेवा तोट्यातून फायद्यात चालवून प्रवाशांना वेळापत्रकानुसार बससेवा पुरविणार असल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीकरानी सत्ता दिल्यास विकासाची गंगा कल्याण डोंबिवलीत आणणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.