महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे दशक्रिया विधी व मुंडन करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध

By

Published : Jun 22, 2021, 4:26 PM IST

Updated : Jun 22, 2021, 4:42 PM IST

मराठा आरक्षणाबाबत व मराठा समाजाच्या अन्य मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकार उदासीन भूमिका घेत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारचा दशक्रिया विधी व मुंडन करून निषेध आंदोलन करण्यात आले.

nationl chawa sanghatna  Protest
nationl chawa sanghatna Protest

सोलापूर - केंद्र व राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत व मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहे. त्यामुळे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारचा दशक्रिया विधी व मुंडन करून निषेध आंदोलन करण्यात आले. या दशक्रिया विधी व मुंडण आंदोलनात छावाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी केंद्र सरकारचा, तर अविनाश पाटील यांनी राज्य सरकारचा दशक्रिया विधी करून मुंडन केले.

सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे दशक्रिया विधी -

महाराष्ट्रातील 30 टक्के मराठा समाजाला गेल्या 70 वर्षापासून कोणतेही शासकीय लाभ, सवलती किंवा फायदे मिळाले नाहीत. त्यामुळे मराठा समाज अन्य जातींच्या तुलनेत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून खूपच मागे पडलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मनात सामाजिक विषमता आणि राजसत्तेविषयी प्रचंड चीड व राग असून याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. असे असतानाही राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात तर केंद्र सरकारने इंदिरा सहानी निकालातील 50 टक्के मर्यादे विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही. मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य शासन घेत असलेल्या उदासीन भुमिकेच्या निषेधार्थ छावा संघटनेने दशक्रिया व मुंडण आंदोलन केले.

राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे दशक्रिया विधी व मुंडन आंदोलन
राष्ट्रीय छावा संघटनेच्या मागण्या -
1) केंद्र सरकारने अ‌ॅट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण कायदा करून त्याला अनुसूची 9 चे संरक्षण द्यावे.2)सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण निर्णयाविरोधात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी.3) मराठा आरक्षणासाठी तातडीने स्वतंत्र ओबीसी आयोग नेमावा.4)राष्ट्रीय छावा संघटनेने मागणी केल्याप्रमाणे मराठा समाजाच्या विकासासाठी 30 हजार कोटीचे आर्थिक पॅकेज द्यावे. 5)जिल्हास्तरावर मराठा विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वसतिगृहे चालू करावीत.6)अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती वाढवून एक हजार कोटीचा अतिरिक्त निधी द्यावा आणि शेत मालाला हमीभाव देवून बाजार समितीत मोफत भोजन व निवास व्यवस्था करावी. अशा मागण्याही छावाच्या वतीने यावेळी करण्यात आल्या.


27 जूनला राजभवन मुंबई येथे आत्मदहन करणार -

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने वार्षिक 30 हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज नाही दिले तर छावा संघटनेचे योगेश पवार हे 27 जून 2021 रोजी राजभवन, मुंबई येथे आत्मदहन करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या आंदोलनावेळी छावाचे योगेश पवार, सरपंच वैशाली जयवंत धुमाळ, उपसरपंच रोहन कुमार भिंगारे, संजय पारवे, ग्रामपंचायत सदस्य, जोशी समाज, लिंगायत समाज, गोसावी समाज, बौध्द समाज, वडार समाज, कोळी समाजातील बांधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Last Updated : Jun 22, 2021, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details