सोलापूर -साडेएकवीस लाख कोटीचे पॅकेज सरकारने जाहीर केले. त्यात उद्योजकांच्या कर्जासाठी साडेअकरा लाख कोटी राखून ठेवले, भांडवलदारांचे साडेसात लाख कोटी कर्जमाफी केली तर कामगारांसाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली. जनधनच्या नावाने फक्त 500 रुपयांची मदत दिली. ही विसंगती आम्हाला मान्य नाही. केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीकडून 3 जुलै हा दिवस मागणी दिन पाळण्याची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सोलापूरात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सकडून शुक्रवार 3 जुलैला ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
ऑगस्टच्या आत याचा निर्णय नाही झाल्यास एक लाख कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी यावेळी दिला. सिटूचे राज्य महासचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विडी, यंत्रमाग, घरेलू, रेडिमेड व शिलाई, ऑटोरिक्षा चालक तसेच 122 उद्योग धंद्यातील असंघटीत कामागरांचे टाळेबंदीच्या कालावधीतील उदरनिर्वाहासाठी राज्य सरकार 10 हजार रुपये रोख अनुदान देण्यात यावे. या मागणीकरता प्रत्येकांचे वैयक्तीक अर्ज भरून सिटूकडे जमा केलेले आहे. यासाठी 25 मे पासून ते 30 जून पर्यंत अर्ज भरण्याची मोहिम राबविण्यात आली.