महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उजनी पाणी बचाव समितीचे सोमवारपासून जिल्हाभरात आंदोलन - अतुल खुपसे - उपमुख्यमंत्री अजित पवार

उजनी जलाशयातील पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आहे. गेल्या दीड महिन्यापासून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून उजनी बाबत आंदोलने केली जात आहेत.

अतुल खूपसे पाटील
अतुल खूपसे पाटील

By

Published : May 23, 2021, 9:49 PM IST

पंढरपूर -उजनी जलाशयातील पाणी हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आहे. गेल्या दीड महिन्यापासून उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून उजनी बाबत आंदोलने केली जात आहेत. मात्र राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूरकरांची दिशाभूल करण्यासाठी पाच टीएमसी पाणी बाबत मंजूर झालेला आदेश रद्द करत असल्याचे सांगितले. त्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी पाच दिवस सांगितले होते. मात्र अद्यापही आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे उजनी धरण पाणी बचाव समितीकडून उद्यापासून जिल्हाभरात आंदोलने केली जाणार आहेत, अशी माहिती उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

'जयंत पाटलांकडून फसवणूक, उद्यापासून जिल्ह्याभरात आंदोलन'

'मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच मंत्र्यांकडून दिशाभूल'
उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिल रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर त्या पाच टीएमसी पाण्यासाठी भाजप, शेतकरी संघटना व इतर संघटनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आली होती. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून मुख्यमंत्र्यांची राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील हे दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणी योग्य तो न्याय करावा अशी मागणीही खूपसे पाटील यांनी केली.

'उपमुख्यमंत्री पवार व जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडून फसवणूक'
उजनी धरण पाणी बचाव समितीकडून जिल्ह्याभरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. पाच दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र पाच दिवस होऊन गेले तरी कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढण्यात आला नाही. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उजनी धरणातील पाणी मोजण्यासाठी आपल्या मर्जीतील अधिकारी नेमले आहेत. पाणी मोजणी झाल्यानंतर ते अधिकारी लवादाकडे आपला अहवाल सादर करतील आणि पुन्हा तीन महिन्यानंतर उजनीतील पाणी पळवण्याचा प्रयत्न करतील असा आरोपही त्यांनी केला.

'24 मे पासून बचाव समितीकडून जिल्हाभरात आंदोलन'
उजनी धरण पाणी बचाव समितीकडून 24 मेपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्याचा प्रत्येक पोरगा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही प्रतिपादन खूपसे पाटील यांनी केले.

हेही वाचा - पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रसह, घाट भागात पावसाची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details