पुणे -नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न चांगलाच गाजला होता. यावेळी गिरीश बापट यांनी पुण्यात लवकरच २४ तास पाणीपुरवठा करणार असल्याचा दावा केला होता. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये मिळून केवळ १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट.. तोडगा काढण्यासाठी शहरवासीयांना नवीन पालकमंत्र्यांची प्रतीक्षा - गिरीश बापट
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये मिळून केवळ १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांमध्ये धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे या धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे पुण्याला नियमित पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पुण्यातील पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यावर तोडगा म्हणून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी समान पाणीपुरवठा योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला होता.
लोकसभा निवडणुकीत बापट यांच्या विजयामुळे पुण्याचे पालकमंत्री पद रिक्त झाले आहे. त्यामुळे मावळमध्ये अजित पवारांचे आव्हान मोडीत काढणाऱ्या लक्ष्मण जगताप आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिरीश महाजन यांची नावे पुण्याच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदी सक्षम आणि योग्य उमेदवाराला संधी द्यावी, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.