पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांची लूट प्रकरण, 22 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली - परप्रांतीय प्रवाशांची पुणे रेल्वे स्थानकावर लुट
परप्रांतीय प्रवाशांच्या जवळील पैसे जबरदस्तीने काढून घेतले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला होता. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आंदोलनही केले होते. त्यानंतर आता पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील तब्बल 22 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना खडकी मुख्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

पुणे- टाळेबंदीमुळे पुणे रेल्वे स्थानकावरून गावाकडे निघालेल्या परप्रांतीय प्रवाशांच्या जवळील पैसे जबरदस्तीने काढून घेतले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला होता. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आंदोलनही केले होते. त्यानंतर आता पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील तब्बल 22 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना खडकी मुख्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या बदलीनंतर पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नवीन 50 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
सध्या टाळेबंदीमुळे गावी परत जाण्यासाठी पुणे स्थानकात प्रवाशांची गर्दी आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे, बोगस तिकीट विक्रेते किंवा इतरही काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी लोहमार्ग पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, काहीजण नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यावरून या अंमलदारांकडून त्यांची जबाबदारी पार पाडली जात नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी कर्मचाऱ्यांची खडकी येथील पुणे लोहमार्ग पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील म्हणाले, प्रवाशांच्या लुटीशी लोहमार्ग पोलिसांचा संबंध नाही. मात्र, रेल्वे स्थानकात विविध गुन्ह्यात यापूर्वी २३ तोतया पोलिसांवर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. हेच लोक किंवा अशा प्रवृत्ती वारंवार गुन्हे करत असण्याची शक्यता आहे. या प्रकारांना अटकाव करू न शकल्याने २२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.