महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रबोधनकारांचा पुरोगामीत्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक - अजित पवार - prabodhankar thackeray

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात प्रबोधन शताब्दी सोहळ्याचा समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार संजय शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव दिलीप पांढरपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रबोधनकारांचा पुरोगामीत्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक - अजित पवार
प्रबोधनकारांचा पुरोगामीत्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक - अजित पवार

By

Published : Jan 27, 2021, 10:15 AM IST

पुणे - प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. प्रबोधन पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. प्रबोधन शताब्दी महोत्सवादरम्यान ते बोलत होते.

शासन सर्वोत्तपरी सहकार्य करणार - अजित पवार
संवाद पुणे संस्थेने आयोजित केलेल्या प्रबोधन पाक्षिकाच्या शतकोत्सवासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी सिंहाचा वाटा असणाऱ्या प्रबोधन पाक्षिकाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने प्रबोधनाची शतक महोत्सवी वाटचाल, त्यांची पत्रकारिता अभिनंदनीय आहे. प्रबोधनकार प्रभावी वक्ते, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार, साहित्यिक, चित्रकार, बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी प्रबोधन पाक्षिक सुरु केले. नियतकालिक सुरू करून चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस यशस्वी करून दाखवले. प्रबोधन पाक्षिकाने महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली. नव्या विचाराची पिढी घडविण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. प्रबोधन पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केल्याचेही यावेळी पवार म्हणाले.

पुण्यात प्रबोधनाचा विचार प्रबोधनकारांनी मांडला - निलम गोऱ्हे
पुणे शहरात प्रबोधनाचा विचार मांडण्याचे कार्य प्रबोधनकार ठाकरे यांनी केल्याचे विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. प्रबोधनच्या शतकोत्सव कार्यक्रमांमध्ये सर्वच विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करून साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य होत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

प्रबोधनकारांनी विचारांची क्रांती केली - गिरीश बापट
प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक उपक्रमांत सहभाग घेतला असून समाजामध्ये विचारांची क्रांती केली असे खासदार गिरीश बापट यावेळी बोलताना म्हणाले.

कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
संवाद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनाला उस्फुर्त प्रतिसाद यावेळी मिळाला. सामाजिक, प्रबोधनपर तसेच विविध विषयांवरील कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, परत दौंडकर, अरुण पवार, तुकाराम धांडे, बंडा जोशी यांनी संमेलनात सहभाग घेतला.

हेही वाचा -राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून होणार सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details