महाराष्ट्र

maharashtra

मराठा आरक्षण : गरज पडल्यास एक दिवसीय अधिवेशन घेऊ - अजित पवार

By

Published : May 7, 2021, 6:30 PM IST

Updated : May 7, 2021, 7:33 PM IST

मराठा आरक्षणावर काहीजण राजकारण करत आहेत. चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्याला अर्थ नाही, असे अजित पवार म्हणाले.

ajit pawar
अजित पवार

पुणे -मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारचे काहीही चुकलेले नाही. न्यायालयाने जरी निर्णय दिला असला तरी केंद्र आणि राष्ट्रपती याबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र, काहीजण याचे राजकारण करत आहेत. चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्याला अर्थ नाही, असे अजित पवार म्हणाले. न्यायालयाचा निकाल धक्का देणारा आहे. मात्र, इतर वर्गावर अन्याय न होऊ देता आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. तसेच गरज पडल्यास एक दिवसीय अधिवेशन घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार

आता मराठा आरक्षणाबाबत जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनात हा विषय घेऊ किंवा गरज लागल्यास खास एक दिवसाचे अधिवेशन बोलावू, केंद्राने याबाबत कलम 370 प्रमाणे निर्णय घ्यावा असे आमचे म्हणणे असून गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संकट ओसरल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटण्याची मानसिकता आघाडी सरकारची असल्याचे अजित पवार म्हणाले.

पुण्यातील लॉकडाऊनबाबत आज झाली बैठक

पुणे शहरात लॉकडाऊनबाबत उच्च न्यायालयाने सरकारला सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागणार का याची चर्चा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात याबाबत भाष्य केले. लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत मी बोलणार नाही, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र, सध्याच्या परिस्थितीबाबत आढावा घेताना काही बाबी निदर्शनास येत असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यांनी शुक्रवारी कोरोना आढावा बैठक घेतली त्यानंतर ते बोलत होते.

या बैठकीत लॉकडाऊनची गरज असल्याचे काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं आहे, तर सकाळी काही दुकाने उघडी असतात त्यामुळे लोक वेगवेगळी कारणं देत बाहेर पडतात, त्यांना रोखायचे कसे अशी अडचण पोलिसांनी बोलून दाखवली. दुसरीकडे सध्या सुरू आहे तशाच पद्धतीने नियम चालू ठेवून अधिक कडक निर्बंध करावेत अशा सूचना दिल्या आहेत. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी करता आली तर निकाल चांगला मिळेल, असे देखील वाटत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा -अकलूज येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

पुढील काळासाठी नियोजन

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्याला सामोरे जावे लागेल असे अनेक जण सांगतात. त्यामुळे सरकार त्याला तोंड देण्यासाठी प्रयत्न करत असून, ऑक्सिजन प्लांट निर्मितीवर भर दिला जात असल्याचे सांगत, कोरोना संसर्ग लहान मुलांमध्ये देखील आढळू शकतो ही शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी पुण्यातील राजीव गांधी रुग्णालय राखीव करत आहेत, तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.

लस उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत

आज लसीकरण अनेक ठिकाणी ठप्प आहे. नागरिकांना लस उपलब्ध होत नाही ही स्थिती आहे. मात्र, सुरुवातीलाच भारताने लस बाहेर द्यायला नको होती, रशियाने जसे त्यांचे लसीकरण झाल्यावर इतरांना लस दिली तसे आपण केले नाही. आपल्याकडे अत्यंत चुकीचा निर्णय झाला, बाहेर द्यायची अजिबात आवश्यकता नव्हती. नियोजन करायला हवं होते असे सांगत पुरवठा नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारचे लस उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

काकडेंची विश्वासहर्ता आहे का

दरम्यान, आघाडी सरकारवर टीका करणारे भाजपचे राज्य उपाध्यक्ष संजय काकडे यांच्यावर अजित पवारांनी टीका केली. ज्या व्यक्तीबद्दल विचारताय त्यांची विश्वासाहर्ता काय, संजय काकडे यांची विश्वासार्हता नाही. त्यांच्याबद्दल काय बोलणार असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा -आत्महत्येतही महाराष्ट्र अव्वल! 2019 मध्ये 18,916 जणांनी संपविले जीवन!

Last Updated : May 7, 2021, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details