पुणे - दिवाळीत रस्त्यांवर इतकी गर्दी होती की, कोरोना चेंगरून मेला की काय ? अशी परिस्थिती होती. पुण्यातील बाजीराव रस्त्यावर तर भयानक गर्दी होती. कोरोनाचा अनुभव मी पण घेतला आहे, फार भयानक काम आहे. कोणी भेटायला येत नाही, काही नाही. कुठल्याही राजकीय व्यक्तीला कार्यकर्ते भेटल्याशिवाय करमत नाही. पण कोरोना झाल्यानंतर यातलं काही होत नाही. एकटच रहावं लागतं, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना झाल्यानंतरचा आपला अनुभव कथन केला.
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत बोलताना त्यांनी हे सांगितले.
माणसं मेल्यावर लस येणार का -
लस आली म्हणता पण कधी येणार ही लस ? माणस मेल्यावर लस येणार का ? असे सांगताना अजित पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. याचा प्रत्यय दिल्लीत आला आहे. तेथील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा होत नाही हे डोक्यातून काढा. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.