पुणे : हरतालिका व्रत सुवासिनी आपल्या नवर्याच्या दिघार्युष्यासाठी करतात. या दिवशी महादेव-पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जळी व्रत करतात. शृंगार करून व्रत, पूजा, आरती करतात. व्रताची कथा वाचतात. अनेक स्त्रिया रात्री चंद्राला अर्घ्य देखील देतात. हा सण आज साजरा केला जात आहे.
कुमारिका-सुवासिनींसाठी श्रेष्ठ-पवित्र व्रत हरतालिका हरतालिका व्रताची अख्यायिका
अशी अख्यायिका आहे, की एके दिवशी शंकर- पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारले, की महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते? ज्यात श्रम थोडे आणि फळ पुष्कळ मिळेल. असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ; त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्याईतून तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.
पार्वतीच्या लग्नासाठी वडिल चिंताग्रस्त
शंकर म्हणाले, की हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतं. चौंसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य पती आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानेही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस. महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिय्येचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसर्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केली, अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात.
हरतालिका व्रताचा विधी
ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचं लिंग (पिंड) स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं. दरम्यान, असे मानले जाते की हरतालिका व्रत केल्याने अखंड सौभाग्य लाभते. संसारात आनंद आणि शांती मिळते.
हेही वाचा -गणेशोत्सव 2021 - दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी तूफान गर्दी