महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 13, 2021, 7:01 PM IST

Updated : Aug 13, 2021, 7:16 PM IST

ETV Bharat / city

संजय राठोड यांच्यावर पोलीस कारवाई कधी होणार? - चित्रा वाघ

पीडित महिलेने या प्रकरणी यवतमाळ पोलिसांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून तक्रार दिली आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाले आहे. त्यांनी गृहमंत्री आणि आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

चित्रा वाघ
चित्रा वाघ

पुणे -शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने लैंगिक छळ केल्याची तक्रार केली आहे. पीडित महिलेने या प्रकरणी यवतमाळ पोलिसांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून तक्रार दिली आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाले आहे. त्यांनी गृहमंत्री आणि आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भाजपा नेत्या चित्रा वाघ



चित्रा वाघ म्हणाल्या, यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी अशा प्रकारची नेहमी तक्रार आल्याचे सांगितले. परंतु अद्याप त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 24 तासात अशाप्रकारच्या तक्रारीवर कारवाई करणे अपेक्षित असताना यवतमाळ पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यवतमाळ पोलिसांना सुप्रीम कोर्टाचे नियम लागू होत नाहीत का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राठोड यांच्यावर नव्याने झालेल्या आरोपानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत अशा प्रकारच्या आरोप केवळ टीआरपीसाठी होत असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ही कसली मग्रुरी, हा तर सत्तेचा माज आहे. तक्रारीत आरोपींचे स्पष्ट नाव आहे, तिने त्यात घडलेला प्रकार सांगत पीडितीने मदतीची मागणी केली. त्यामुळे यवतमाळ पोलीस आता काय कारवाई करतात हे बघायचे असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पुन्हा निशाण्यावर

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांकडून अजूनही संजय राठोड विरोधात गुन्हा दाखल न केल्यामुळे संतप्त झालेल्या चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यशैलीविषय पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले. ढळढळीत पुरावे असताना पुणे पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. दोन महिन्यांनी फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला पण पोलिसांनी अजूनही कारवाई केली नाही. या प्रकरणात पहिल्या दिवसांपासून पुणे पोलिसांची भूमिका समस्या संशयास्पद राहिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांचे कर्तृत्व दाखवलेच आहे, आता यवतमाळ पोलीस काय करतात ते बघूयात, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

'पोलीस अधिकारी दीपक लगडवर पोलीस आयुक्तांची विशेष मर्जी'

पूजा चव्हाणचा मृत्यू ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला त्या वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी तपासादरम्यान हलगर्जीपणा केला. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत केली होती. परंतु अजूनही सरकारने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यावर सरकार आणि पोलीस आयुक्तांची विशेष मर्जी असल्याचे दिसून येत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा -हा तर राजकीय आयुष्यातून उध्वस्त करण्याचा डाव; संजय राठोडांची प्रतिक्रिया

Last Updated : Aug 13, 2021, 7:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details