पणजी - गोवा सरकारने मागील 10 वर्षांत एकाही स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाला सरकारी नोकरीत सामावून घेतलेले नाही. तसेच गोवा लोकसेवा आयोगाकडून मनमानी भरती करताना नाव एकाचे आणि रोजगार दुसऱ्याला असा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आज पणजीतील आझाद मैदानावर तिरडी आंदोलन करण्यात आले. यापूर्वी अनेकदा सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे या आंदोलकांनी सांगितले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांकडून पणजीत तिरडी आंदोलन - strick news in panji
आवश्यक शैक्षणिक पात्रता असून आजही राज्यात सैनिकांची 267 मुले बेरोजगार आहेत. पणजीतील आझाद मैदानावर तिरडी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाविषयी बोलताना अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट म्हणाले, गोवा सरकारने 1996 मध्ये अधिसूचना जारी करत स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी अ आणि ब दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी 5 टक्के तर क आणि ड दर्जाच्या कर्मचारी भरतीसाठी 2 टक्के आरक्षण जाहीर केले होते. आवश्यक शैक्षणिक पात्रता असून आजही राज्यात सैनिकांची 267 मुले बेरोजगार आहेत. तसेच नाव स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाचे आणि रोजगार कुणा दुसऱ्याला देण्याचा मनमानी कारभार गोवा लोकसेवा आयोग करत आहे. त्यामुळे सरकारी खात्यातील हा भ्रष्टाचार उघड करण्याबरोबरच गृह खाते, वैयक्तिक व्यवहार खाते तसेच राज्य सरकार यांच्या नाकर्तेपणाची ही तिरडी आहे. आमच्यावरील अन्याय दूर झाला नाही, तर गोवा मुक्ती दिनादिवशीच (19 डिसेंबर) पुन्हा तिरडी आंदोलन छेडण्यात येईल, असेही शेट यांनी सांगितले. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. आझाद मैदानावर हे आंदोलन छेडण्यात आले.