पणजी- सागरी असो अथवा कृषी क्षेत्रात संशोधन होण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक करावी लागणार आहे. ज्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होईल. शिक्षण क्षेत्रात जर खर्च केला नाही तर दर्जेदार शिक्षण कसे मिळेल. त्यामुळे विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी लागणार, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी (दि. 1 जाने.) दोनापावला येथे केले. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या 54 व्या स्थापनादिन कार्यक्रमात 'सागर विज्ञान आणि समाज' या विषयावर ते बोलत होते.
पुढे बोलताना राज्यपाल मलिक म्हणाले, भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणजे ' समुद्र मंथन' आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून आम्ही समुद्राच्या गर्भाशयात काय दडले आहे, याच्याशी जोडले गेलो आहोत. समुद्र जमिनीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. कारण 36 टक्के पेट्रोलियम पदार्थ, 28 टक्के वायू आणि 80 टक्के व्यापार या माध्यमातून होत आहे. समुद्री संशोधन देशासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. परंतु, प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.