नाशिक : सध्या राज्यात नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप-मनसे एकत्रित येतील असं म्हटलं जातं आहे. मात्र जोवर मनसे परप्रांतियांविषयी भूमिका बदलत नाही, तोवर एकत्र येणे शक्य नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
मनसे परप्रांतियांविषयी भूमिका बदलत नाही, तोवर एकत्र येणे शक्य नाही - चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप-मनसे एकत्रित येतील असं म्हटलं जातं आहे. मात्र जोवर मनसे परप्रांतियांविषयी भूमिका बदलत नाही, तोवर एकत्र येणे शक्य नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
![मनसे परप्रांतियांविषयी भूमिका बदलत नाही, तोवर एकत्र येणे शक्य नाही - चंद्रकांत पाटील मनसे परप्रांतियांविषयी भूमिका बदलत नाही, तोवर एकत्र येणे शक्य नाही - चंद्रकांत पाटील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12487163-940-12487163-1626510937056.jpg)
राज ठाकरे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व
राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे नाही. आमची जुनीच ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याच वेळी महापालिकेच्या निवडणूका अद्याप फार दूर आहेत, असेही पाटील म्हणाले.
शिवसेना भाजपसोबत येईल असं वाटतं नाही
शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत नसलो तरी आमचे त्यांच्याशी वैरदेखील नाही. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी आंदोलने करतो. तुम्ही एकत्रित निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळे सरकार चालते. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात. मात्र, ते भाजपसोबत येतील असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले.
आम्ही अन्यायाविरोधात आक्रमक
ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांबद्दल बोलताना पाटील म्हणाले, ईडी ही एक केंद्रीय स्वायत्त संस्था आहे. त्यावर मी काहीही भाष्य करणार नाही आणि चौकशांना घाबरायचेही कारण नाही. तसेच आम्ही राष्ट्रवादी नव्हे, तर अन्यायाविरोधात आक्रमक आहोत. आम्ही महाविकास आघाडीतील कुण्याही एका ठराविक पक्षाविरोधात नसल्याचे ते म्हणाले.
पंकजा मुंडे नाराज नाही
पंकजा यांच्या कारखान्यासंदर्भातच कारवाई केली नाही. इतरही अनेक कारखान्यांवर कारवाई झाली आहे. पंकजा मुंडे नाराज नाहीत, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि ते स्वाभाविक आहे. पण पंकजा यांनी त्यांना समजावले आहे. मात्र, याचा आणि त्यांच्या कारखान्याला आलेल्या नोटिसीचा काहीही संबंध नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -BMC Election : मनसे सोबत युतीबाबतचा निर्णय योग्यवेळी घेऊ; फडणवीसांचे सूचक वक्तव्य