महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 11, 2021, 4:19 PM IST

ETV Bharat / city

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट, जलसंपदा विभागाचे पालिकेला पाणी काटकसरीने वापरण्याचे पत्र

नाशिकरांना येत्या आठवडाभरात पाणी कपतीच्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने नाशिक महापालिकेला जलसंपदा विभागाने पत्र लिहून पाणी काटकसरीने वापरावे, अशा सूचना केल्या आहे.

पाणीकपातीचे संकट
पाणीकपातीचे संकट

नाशिक -नाशिकरांना येत्या आठवडाभरात पाणी कपतीच्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने नाशिक महापालिकेला जलसंपदा विभागाने पत्र लिहून पाणी काटकसरीने वापरावे, अशा सूचना केल्या आहे. याशिवाय अतिरिक्त पाणी वापरल्यास दंडात्मक दराने पालिकेला पाणी घ्यावे लागेल, असाही इशारा जलसंपदा विभागाने या पत्रात केला आहे.

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट, जलसंपदा विभागाचे पालिकेला पाणी काटकसरीने वापरण्याचे पत्र

जलसंपदा विभागाने दिले महापालिकेला पत्र
पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना लोटला असला तरी जिल्ह्यात अद्याप पावसाचे आगमन न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रामध्ये पावसाने ओढ दिल्याने आता येत्या आठवडाभरातच नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता दाट झाली आहे. महापालिकेने काटकसरीने पाणी वापरावे, अशा सूचना करणारे पत्र जलसंपदा विभागाकडून महापालिकेला देण्यात आले आहे.

अतिरिक्त पाणी वापरल्यास दंडात्मक दराने पालिकेला पाणी द्यावे लागणार
पुढील आठवडाभरात पाऊस पडला नाही तर 15 जुलैनंतर शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा सूचना वजा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला असताना आता महापालिकेने काटकसरीने पाणी वापरावे, अशा सूचना करणारे पत्र जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला पाठवण्यात आले आहे. याशिवाय अतिरिक्त पाणी वापरल्यास दंडात्मक दराने पालिकेला पाणी द्यावे लागेल, असा इशारा देखील या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

पालकमंत्र्यांनी देखील केल्या प्रशासनाला पाणी जपून वापरण्याच्या सूचना
जलसंपदा खात्याने पाणीकपाती बद्दल महापालिकेला पत्र व्यवहार केला असेल तर त्याच्यावर योग्य तो निर्णय पुढच्या आढवड्यात घ्यावा लागेल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाचा असला तरी मात्र पाणी जपून वापरले नाही तर येत्या काळात नाशिकची लातूरसारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही. वेळीच सांभाळून पावले टाकण्याचा सल्ला मनपा आयुक्तांना दिला आहे. जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पाणीसंकट गडद झाले आहेच, तर त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या देखील अडचणी आता वाढल्या आहे. जिल्हयात आतापर्यंत फक्त 27 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पावसाचे पुनरागमन न झाल्यास पेरण्या तर रखडतीलच तर दुबार पेरणीचे देखील संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने अनेक धरनांनी तळ गाठत आहे. नाशिकला पाणी पुरवठा करण्याऱ्या गंगापूर धरणात देखील 35 टक्के पाणी साठा शिल्लक आहे,त्यामुळे पाणी कपातीच संकट गडद झाले आहे.

आठवडाभरातच होणार पाणिकपातीचा निर्णय

नाशिकला ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले असले तरी मात्र जलसंपदा विभागाने काटकसरीने पाणी वापरण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. यातच पालकमंत्र्यांनी देखील धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे चिंता व्यक्त केल्याने आता येत्या आठवडाभरात महापालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे येत्या आठवडाभरात पाणी कपातीचा निर्णय घेतला तर नाशिककरांना पाणीकपातीचा संकटाला तोंड द्यावे लागणार हे मात्र स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा -मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय - राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details