नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही. यासाठी टप्याटप्प्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वय ठेवून पूरपरिस्थिती हाताळावी, अशा सूचना राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. ( Nashik Collector Gangatharan D. ) यांना दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने शहर व जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी आज नाशिक गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. ( Large Increase in Reservoir of Nashik Dam )
तातडीने पंचनामे करावे : जिल्हाधिकारी यांच्या भेटीदरम्यान छगन भुजबळ यांनी पुराची भीषणता जाणवणार नाही, यासाठी टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. गोदावरी नदीत निर्माण झालेल्या पानवेलींमुळे निफाड तालुक्यातील बंधाऱ्याना धोका निर्माण होत असून, त्या तातडीने हटविण्यात याव्यात. नाशिक शहरातील धोकादायक वाड्यातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासोबतच पडलेल्या वाड्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात यावा. तसेच, लासलगाव-विंचूरसह 16 गावे पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणाचे एक गेट बंद करण्यात यावे अशा सूचना केल्या.