नागपूर -सुरुवातीला एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एमपीएससीची नव्याने तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता 21 मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार आहे. पण याच दिवशी दुसऱ्या देखील काही परीक्षा आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांचे फॉर्म भरले आहेत, अशा विद्यार्थ्यांना आता केवळ एकच परीक्षा देता येणार आहे. एमपीएससी परीक्षेचे पुन्हा एकदा चुकीचे नियोजन करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
सध्या एमपीएससीच्या परीक्षेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. यातच पाच वेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी संतापले आहेत. 14 तारखेला परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत होते, मात्र पुन्हा एकदा नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे, आता 21 मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार आहे. 21 मार्चला आणखी देखील काही परीक्षा असल्याने, विद्यार्थ्यांना केवळ एकावेळी एकच परीक्षा देता येणार आहे. याबाबत भाजपयुमोच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असे या निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनाचा इशारा
एमपीएससीची परीक्षा 14 तारखेला घेण्यात काय अडचण आहे. परीक्षा रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ चालावला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. केंद्रीय आयोगाच्या वतीने राज्याची यंत्रणा वापरून परीक्षा घेतल्या जात आहेत. बँकिंग परीक्षा होत आहे. स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा होत असताना राज्यातील यंत्रणेला राज्यात परीक्षा घ्यायला काय अडचणी आहेत असा सवाल केला जात आहे. राज्य सरकारकडून प्रत्येकवेळी कोविडचे कारण पुढे केले जात आहे. एमपीएससीची परीक्षाचे योग्य नियोजन न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा आकार फाऊंडेशनचे स्पर्धा परीक्षा शिक्षक राम वाघ यांनी दिला आहे.