नागपूर - उपराजधानीत केवळ २४ तासात तिघांची हत्या झाल्याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान नागपुरात थांबलेल्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. २४ तासात हत्येच्या तीन घटनांनी नागपूर पोलिसांची पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
पहिला घटना यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कारागृहातुन नुकतीच सुटका झालेल्या एका गुन्हेगाराची तिघांनी मिळून हत्या केली आहे. अनुज बघेल ठाकूर असे मृताचे नाव आहे. १६ मे रोजी तो कारागृहातुन बाहेर आला होता. एका वर्षांपूर्वी मृतक अनुज याने मोहम्मद सलीम उर्फ मक्कान अन्सारी याची दुचाकी जाळली होती, त्या गुन्ह्यात अनुजला पोलिसांनी अटकदेखील केली होती. १६ मे रोजी त्याची कारागृहातुन सुटका झाली होती. काल रात्री मोहम्मद सलीम आणि अनुज यांचा आमना सामना झाला तेव्हा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. आरोपी मोहम्मद सलीम याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने अनुजचा खून केला आहे. अनुजच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.