महाराष्ट्र

maharashtra

नागपूर विभाग : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ?

By

Published : Sep 21, 2019, 12:01 PM IST

नागपूर विभागातून आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप वरचढ ठरेल असेच दिसून येत आहे. तर, एका आमदाराच्या भविष्यावर जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेसपुढे निदान 2014 चे परफॉर्मन्स टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: नागपूर विभाग आढावा

नागपूर -जिल्ह्यात ज्या वेगाने काँग्रेस पक्ष कुमकुवत होत गेला, त्याच वेगात भाजपने आपली पकड मजबूत केलेली आहे. त्यामुळे आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप वरचढ ठरेल असेच दिसून येत आहे. तर, एका आमदाराच्या भविष्यावर जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेसपुढे निदान 2014 चे परफॉर्मन्स टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: नागपूर विभाग आढावा

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एकाच ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. सावनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार हे स्वतःच्या कर्तुत्वाने निवडून आले असून त्यांच्या विजयात काँग्रेसचा हातभार नसल्यासारखाच म्हणावा लागेल. कामठी विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री महोदयांना पराभवाचा धक्का देत कामठीचा गड कायम ठेवला होता.

हेही वाचा... उत्तर महाराष्ट्र विभाग : युतीच्या जागा टिकणार की वाढणार? काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मात्र अस्तित्वाची लढाई

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध राजेंद्र मुळक सामना रंगण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. दुसरीकडे उमरेड विधानसभा मतदारसंघातून आमदार सुधीर पारवे विरुद्ध त्यांचेच बंधू राजा पारवे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याठिकाणी सामना अटीतटीचा होणार असून धक्कादायक निकाल लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील केदार यांना 2014 मध्ये एकाप्रकारे लॉटरीच लागली होती. मोदी लाटेत जिल्ह्यातील बारापैकी अकरा जागांवर भाजपने काबीज केल्या होत्या. मात्र, सावनेर येथे भाजपला यश मिळवता आले नाही. त्यामागचे कारण देखील वेगळा आहे, ऐनवेळी भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांची उमेदवारी रद्द झाल्याने एकाप्रकारे सुनील केदार यांना उमेदवारी देण्यात आली होती. याव्यतिरिक्त हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे हे भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. त्यांना माजी मंत्री रमेश बंग यांनी आवाहन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळेस हिंगणा मतदारसंघात परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी कमळ सोडून हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधल्याने तिथे समीर मेघे विरुद्ध विजय घोडमारे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: नागपूर विभाग आढावा

हेही वाचा... पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा...

रामटेक आणि काटोल विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात येतो. मात्र, 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यामुळे या दोन्ही जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आल्याने त्या दोन्ही जागा भाजपकडे कायम राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. काटोल आणि रामटेक विधानसभा मतदारसंघ भाजपकडे कायम राहिल्यास नागपूर शहरातून आणि जिल्ह्यातून शिवसेनेचे अस्तित्व संपेल. त्यामुळे शिवसेनादेखील एक तरी मतदारसंघ मिळावा याकरिता प्रयत्न करत असेल. रामटेक विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. येथून 2014 मध्ये मल्लिकार्जुन रेड्डी हे विजयी झाले होते. मात्र, राजकीय घडामोडी वेगाने घडल्यास काही आयारामांचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आयारामांना तिकीट देऊन भाजप रामटेक सागड वाचवण्याच्या प्रयत्नात असेल, याशिवाय काटोल विधानसभा मतदारसंघाचे चित्र देखील तितकाच रंजक ठरणार आहे. 2014 मध्ये येथून भाजपच्या उमेदवारीवर डॉक्टर आशिष देशमुख निवडून आले होते. मात्र, निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असतानाच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना काटोलमध्ये विजय साकारणे सोपे होऊ शकते.

एकंदरीत जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास भाजपला एखाद-दुसऱ्या जागेचे नुकसान सहन करावे लागू शकते तर, आघाडी देखील आपल्या आमदारांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नातच राहील.

हेही वाचा... पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार

ABOUT THE AUTHOR

...view details