नागपूर - कौटुंबिक हिंसाचार, किरकोळ वाद- विवाद आणि मतभेद यासह अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लग्नानंतर पती- पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररित्या तोडण्याची प्रक्रिया म्हणजे घटस्फोट होय. घटस्फोटामुळे वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वतंत्र मिळाले असले, तरी त्यामुळे अनेक बिकट समस्या देखील निर्माण होतात. यात प्रामुख्याने या दांपत्याच्या अपत्यांची हेळसांड होते. ही वाढती समस्या जर प्राथमिक स्तरावरचं सोडवली गेली, तर भविष्यात घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. याच उद्देशाने नागपूर पोलिसांनी काही वर्षांपूर्वी भरोसा कक्षाची स्थापना केली होती. आज या भरोसा कक्षामुळे दरवर्षी शेकडो कुटुंब आपसातले वादविवाद आणि मदभेद विसरून पुन्हा नव्याने संसारात रमले आहेत. गेल्यावर्षी तर भरोसा कक्षात आलेल्या एकूण तक्रारींपैकी ३९ टक्के दांपत्यांमध्ये समेट घडवून आणण्यात आली आहे. तर यावर्षी आलेल्या एकूण तक्रारींपैकी ३० टक्के दांपत्यांचा संसार पुन्हा रुळावर आलेला आहे. या वर्षा अखेरीस हे प्रमाण ४० ते ४५% वर नेण्याचे उद्दिष्ट भरोसा कक्षाच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे.
या कारणामुळे घटस्फोट मागितले जातात - गेल्या काही वर्षांमध्ये अगदी लहान- लहान विषयांवरून काडीमोड (घटस्फोट) घेण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेमविवाहात तर हे प्रमाण जरा जास्तचं दिसून येते. त्यामुळे घटस्फोट हा शब्द किती स्फोटक असतो, याची कल्पना घटस्फोट घेतलेल्या दाम्पत्यांना नक्की आली असेल. हल्ली तर मोबाईल, सोशल मीडिया या सारख्या विषयांना कारणीभूत धरून देखील घटस्फोट मागितले जात आहेत. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, मानसिक छळ, व्यसनाधीनता आणि लहान- लहान वादविवाद वरून सुद्धा घटस्फोटाचे अर्ज सादर केले जात आहेत. घटस्फोटाची वाढते प्रमाण ही आपल्या समाजासाठी एक गंभीर समस्या बनलेली आहे. त्यामुळेच नागपूर पोलिसांनी अशा काही समस्यांवर प्राथमिक स्वरूपाचा तोडगा काढण्याकरिता गेल्या काही वर्षांपूर्वी भरोसा कक्षाची स्थापना केली आहे.
7 महिन्यात 940 प्रकरणांचा निपटारा -भरोसा कक्षाकडे दर महिन्याला साधारणतः १३० ते १७० प्रकरणे तक्रार स्वरूपात येत आहेत. यामध्ये कौटुंबिक वाद- विवाद पती- पत्नीचे भांडण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर आधारित तक्रारी सर्वाधिक येतात. चालू वर्षाच्या सात महिन्यात भरोसा कक्षाकडे १३४१ प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी ९४० प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे. यामध्ये ४०२ प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा कक्षाला मोठं यश प्राप्त झालेला आहे. या आकड्यांची जर टक्केवारी बघितली, तर हे प्रमाण ३० टक्के इतकं आहे. याशिवाय ४०१ प्रकरणांमध्ये समुपदेशनाची कारवाई सुरू असून यापैकी बहुतांश प्रकरणांचा निपटारा यशस्वीरित्या होईल. त्यामुळे यावर्षी समेट घडवण्याची टक्केवारी ही ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत जाईल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. याव्यतिरिक्त ६४ प्रकरण ही पोलीस कारवाई करिता पाठवण्यात आली आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत एकूण २२ प्रकरण न्यायालयात पाठवण्यात आली आहेत. अर्जदारांच्या म्हणण्यानुसार ३३९ केसेस बंद करण्यात आले आहेत.