नागपूर -वाहनांच्या हॉर्नमुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देश्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक कल्पना सुचवली आहे. त्यानुसार, रस्त्याने जाताना आता तुम्हाला कर्णकर्कश हॉर्न ऐवजी तबला, पेटी, तानपुऱ्याचे स्वर ऐकू आले तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण केंद्रीय वाहतूक मंत्रालय लवकरच या बाबत अध्यादेश काढणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली.
हेही वाचा -झालेल्या विकास कामांची आठवण ठेवा बाकी समझनेवालों को इशारा काफी है - नितीन गडकरी
देशात वायूसह ध्वनी प्रदूषणाचा स्तर दिवसागणिक वाढत आहे. मोठ्या आवाजाच्या हॉर्नमुळे अनेकांना त्रास होतो, तरी देखील अनेक वाहन चालक मोठ्या आवजाचे हॉर्न लावतात, त्यामुळे जणू कानाचे पडदे फाटतील की काय, अशी परिस्थिती सहन करावी लागते. बेजबाबदार वाहन चालक तर विनाकारण जोर जोराने हॉर्न वाजवून इतर वाहन चालकांचे लक्ष विचलित करतात. निष्काळजीपणाने हॉर्न वाजविल्यामुळे वाहन चालक गोंधळून जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वाढते. ध्वनी प्रदूषण देखील वाढते. यावर तोडगा म्हणून नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयातील सचिवांना एक अध्यादेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.