महाराष्ट्र

maharashtra

नागपूरचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांचे निधन; मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

By

Published : Nov 20, 2021, 8:43 AM IST

नागपूरचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. सरदार अटलबहादूर सिंग गे तीनदा नागपूरचे महापौर राहिले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सरदार अटलबहादूर सिंग यांचे निधन
सरदार अटलबहादूर सिंग यांचे निधन

नागपूर- नागपूरचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. सरदार अटलबहादूर सिंग गे तीनदा नागपूरचे महापौर राहिले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली-

सरदार अटलबहादूर सिंग निधनाने नागपूरचे कला-सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारा, शहराच्या विकासासाठी नितांत कळकळ असलेला आणि प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. सरदार अटलबहादूर सिंग यांनी नागपूरच्या सामाजिक-राजकीय संस्कृतीला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजुला सारत ते नेहमीच अग्रेसर असायचे. विद्यार्थी नेता ते समाजाच्या सर्वच क्षेत्रात नेतृत्त्व प्रदान करण्याचे काम त्यांनी केले. एक प्रखर राष्ट्रवादी म्हणून त्यांचा लौकिक होता. स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच क्रांतिकारकांबद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता. ते विद्यार्थी नेता असताना विद्यापीठातील विविध परिसरांना शहीदांची नावे देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसाठी तर होतातच. पण, ते महापौर असताना फुले मार्केटमध्ये गरिबांसाठी पं. हरिप्रसाद चौरसिया आणि बिसमिल्ला खान यांचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता. या संकल्पनेने ते कलावंतही इतके प्रभावित झाले की, त्यांनी मानधन न घेता हा कार्यक्रम केला. सतत अभिनव संकल्पना ते राबवायचे. ‘ग्रामसेवक’च्या रूपाने त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. ध्येयसमर्पित जीवन जगलेला नेता त्यांच्या निधनाने आपल्यातून हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

दिलदार मित्र गमावला - नितीन गडकरी

नागपूर शहराचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनामुळे एक जिवश्च-कंठश्च आणि दिलदार मित्र आपण गमावला असल्याची भावना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी शोक संदेशात व्यक्त केली आहे. कधीही जात-धर्म-पंथ या भेदांत न अडकलेले अटलबहादूर हे माझ्यासाठी मित्र आणि सुहृद होते. त्यांचा-माझा संबंध दीर्घकाळापासूनचा होता. आमची मैत्री पक्षातीत होती व शेवटपर्यंत टिकली. एक अनमोल मित्र गमावल्याचे अपार दुःख मला झाले आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. अटलबहादूर सिंग हे नागपूरच्या राजकारणात सदैव किंगमेकरच्या भूमिकेत वावरले. त्यांच्या नेतृत्वातील लोकमंचाने नागपूर महापालिकेच्या राजकारणात दीर्घकाळ भूमिका बजावली आणि सत्तेचे संतुलन राखण्यात योगदान दिले. महापौर म्हणून त्यांची कारकीर्द सर्वांच्या लक्षात राहील अशी होती. या शहराबद्दल त्यांना फार आस्था होती, प्रेम होते. त्यामुळे या शहरावर कोणतेही संकट आले तरी सर्वप्रथम धावून जाणाऱयांमध्ये, मदत देणाऱया व उभारणाऱ्यांमध्ये अटलबहादूर सिंग असत. संवेदनशील व सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून ते नागपूरकरांच्या सदैव स्मरणात राहतील. दिलेला शब्द पाळणारा आणि कृत्रिम भेदाभेदांच्या पल्याड जाऊन माणुसकीसाठी राबणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनात दाटून आल्या आहेत, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

राजकीय मतभिन्नता असली तरी त्यांनी सर्व क्षेत्रातील माणसं जोडण्याचे काम केले. राजकीय क्षेत्रात वावरतानाच नागपूरच्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राशी त्यांनी निकटचा संबंध राखला आणि अनेक संस्था-संघटनांना भरपूर मदत केली. नागपूर विद्यापीठाच्या सिनेटमध्ये त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ योगदान दिले आणि विद्यापीठाला अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर समाजाभिमुख, विद्यार्थी कल्याणाचे निर्णय घेण्यास भाग पाडले. विविध घटक व क्षेत्रांसाठी त्यांनी केलेले काम हे त्यांचे आपल्यावरील ऋण आहे, अशी भावना श्री. गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते राजकारणात सक्रिय असतानाच्या काळातील नागपूर महापालिकेच्या अनेक निवडणुका, त्यांची लोकसभेची निवडणूक असे अनेक अनुभव माझ्या स्मरणात आहेत. पक्ष आणि राजकारण कोणत्याही दिशेने गेले तरी आपली मैत्री टिकावी याबद्दल ते सदैव जागरूक असत. आम्ही मैत्रीचा धर्म अखेरपर्यंत पाळू शकलो आणि त्याचे सर्व श्रेय मी माझ्या या दिवंगत मित्राला देतो, अशा शब्दांत श्री. गडकरी यांनी अटलबहादूर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details